मुंबई – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली आहे. विभागाने कारखान्याची सुमारे 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली असताना आता स्वतः पंकजा (Pankaja Munde) यांनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.
सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या इतर कारखान्यांना मदत केली. पण माझ्या कारखान्याला छदामही दिला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. “मी सध्या आर्थिकदृष्ट्या प्रचंड तणावातून जात आहे. माझे 9 किलो वजन कमी झाले आहे.
मी दररोज बॅंकांच्या पाया पडत आहे. पण तूर्त तरी कोणतीही मदत झालेली नाही. सध्या माझ्याविषयी सातत्याने बातम्या येत आहेत. त्यावर मी काहीच बोलले नाही तर कसे होईल? दरवेळी मीच सभ्य व समजूतदारपणा दाखवते.
पण काही तथ्य सांगावीच लागतात. काही महिन्यांपूर्वी जीएसटी विभागाने कारखान्यावर छापा टाकला होता. तेव्हा मी स्वतः माझी माणसे पाठवून कार्यालय उघडले. संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कागदपत्रे दिली.
त्यांची शंका दूर केली. तेव्हा त्यांना कोणतीही तफावत आढळली नाही’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आपल्या कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केले आहे.
आम्हाला मदत मिळाली नाही..!
हे खरे आहे की, आम्हाला अगोदर शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागले. आमचा कारखाना खूप अडचणीत आहे. माझ्या कारखान्यावर छापा पडला तेव्हाही मी आश्चर्य व्यक्त केले होते. खरे तर सर्वच कारखान्यांना मदत झाली.
पण माझ्या कारखान्याला मदत मिळाली नाही. मी त्याची तक्रार करत नाही. पण कदाचित मदत मिळाली असती तर मी या पैशांची परतफेड करू शकले असते, असेही पंकजा यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.