मुंबई – महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले, त्याचा आनंद आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच विधेयकावरून कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता. मोदींनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेत, “त्यांची ही टिका क्लेशदायी आहे’ असे म्हणत कॉंग्रेस काळात महिलांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली.
पवार पुढे म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानमंत्र्यांनी काल एकेठिकाणी भाषण करत असताना एक वक्तव्य केले. ते वक्तव्य क्लेशदायक आहे. पंतप्रधानांनी केलेली टीका चुकीची आहे. महिला आरक्षण इतक्या वर्षात लागू करता आले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. 1993 साली माझ्याकडे महाराष्ट्राची सूत्रे होती. राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होत. मी मुख्यमंत्री असताना जून 1993 मध्ये महिला आणि बाल विकास महाराष्ट्रात पहिल्यांदा स्वतंत्र विभाग सुरु केला. ते मंगळवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
1993 मध्ये घटनादुरुस्ती झाली. त्यावेळी देशभरात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक तृतीयांश आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महिलांसाठी आरक्षण लागू झाले. 22 जून 1994 ला महाराष्ट्राने पहिले महिला धोरण जाहीर केले. या धोरणातून महाराष्ट्रात सरकारी, निम सरकारी विभागातील महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33 टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला. असा निर्णय महाराष्ट्राने पहिल्यांदा घेतला, अशी भूमिका पवारांनी मांडली.
कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घ्यावे –
कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्कामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क मागे घ्यावे, अशी मागणीही शरद पवार यांनी यावेळी केली. त्याचबरोबर पियुष गोयल यांची कांदा प्रश्नावर बैठक होत असून त्यांनी शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घ्या, असे आवाहन देखील त्यांनी केले.
पवार पुढे म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडला असून त्यातच कांदा व्यापाऱ्यांनी संप पुकारल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आताच कांदा व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ भेटीसाठी आले होते. त्यांच्याशी व्यापाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. एकूणच कांदा प्रश्न महत्वाचा असून त्यावर तोडगा निघणे आवश्यक आहे, असेही पवारांनी यावेळी म्हटले.
काय म्हणाले होते पीएम मोदी –
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (25 सप्टेंबर) मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर होते. भोपाळमध्ये, त्यांनी जांबोरी मैदानावर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले, यावेळी त्यांनी विरोधी आघाडी I.N.D.I.A. वर हल्ला केला. संसद आणि विधानसभांमध्ये महिला आरक्षणासाठी आणलेल्या नारी शक्ती वंदन कायदा विधेयकाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले, विरोधकांनी हे विधेयक मजबूरीने मंजूर केले. अन्यथा आज विरोधी आघाडीचा भाग असलेले पक्ष ३० वर्षांपासून महिला आरक्षणाला विरोध करत होते. काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले की, हा पक्ष फक्त एका कुटुंबासाठी काम करतो, नकारात्मकता पसरवतो आणि प्रत्येक प्रकल्पाला विरोध करतो.