- पोलीस आणि रिक्षा मालक करताहेत प्रवाशांच्या जिवाशी खेळ
भाग 1
पिंपरी – भंगारातील रिक्षांमधून प्रवासी वाहतूक, मीटरप्रमाणे भाडे आकारणी न करणे, आवश्यक कागदपत्रे जवळ न बाळगणे, गणवेश न घालणे, अधिक नफ्यासाठी क्षमतेपेक्षा दुप्पट प्रवासी बसविणे, रिक्षा स्टॅण्डवरील मक्तेदारी आदी कारणांमुळे शहरातील रिक्षा सेवा प्रवाशांना शिक्षा ठरत आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने प्रवाशांना नाइलाजास्तव रिक्षातून प्रवास करावा लागतो. बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडते. हप्तेखोरी आणि रिक्षा चालक संघटनांच्या दबावामुळे आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झालेले आहे. यामुळे प्रामाणिक रिक्षाचालक बदनाम होत आहेत. याबाबतचा सविस्तर आढावा घेणारी दैनिक प्रभात ची मालिका…
पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने हजारो नागरिक दररोज रिक्षाने प्रवास करीत आहेत. आजमितीला शहरात 25 हजार अधिकृत रिक्षा आहेत. मात्र भंगारातील जवळपास तीन हजार रिक्षा आजही शहरात धावत असल्याचा अंदाज रिक्षा चालक-मालक संघटनांचा आहे. या भंगारातील रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी वेळोवेळी केली आहे. मात्र मनुष्यबळाची कमतरता असल्याचे कारण पुढे करीत या अशा रिक्षांवरील कारवाईला नेहमीच टाळाटाळ केली जाते.
नवीनपेक्षाही जुन्या रिक्षा टकाटक
आरटीओच्या नियमानुसार रिक्षांचे आयुमान 20 वर्ष आहे. परंतु, शहरात 35 वर्षापूर्वीपेक्षा जुन्या रिक्षा आजही धावत आहेत. जुन्या रिक्षांची बॉडी बदलून त्यांना रंग दिला जातो. आतील भागातही सजावट केली जाते. यामुळे नवीन रिक्षांप्रमाणे जुन्या रिक्षा चांगल्या दिसतात.
जुन्या रिक्षांचे दुष्परिणाम
शहरात जुन्या रिक्षा धावत असल्याने त्या वाहतुकीसाठी सक्षम नसतात. यामुळे अपघात होऊन प्रवासी आणि चालक यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच जुन्या रिक्षांमुळे शासनाचा महसूल बुडतो. जुन्या रिक्षा या पेट्रोलवर चालत असल्याने व त्याचे इंजिन जुने असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
भंगार रिक्षाचे अवघे चार हजार
सध्या नवीन रिक्षा खेरदी करायची झाल्यास त्यास जवळपास पावणे दोन लाखांचा खर्च येतो. रिक्षाचे वजन 400 किलो असते. यामुळे त्या भंगारात जरी विकली तर आठ ते दहा हजार रुपये मिळण्याची मालकाला आशा असते. आरटीओ अधिकाऱ्याच्या समोर रिक्षा कट करणे बंधनकारक आहे. यामुळे या रिक्षा कट करण्याचे काम ठराविक भंगारवाले करतात. हे काम करण्यासाठी मिळणाऱ्या आठ हजारांपैकी चार हजार रुपये भंगारात रिक्षा कट करणारा घेतो. यामुळे अवघे चारच हजार रुपये मालकाच्या हाती येतात.
दहा वर्षापासून कारवाईच नाही
शहर पुणे पोलीस आयुक्तालयात असताना वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी दहा वर्षापूर्वी संयुक्तरित्या भंगार रिक्षांवर कारवाईची मोहीम राबविली होती. यावेळी जप्त केलेल्या शेकडो रिक्षा निगडीतील भक्ती-शक्ती येथील पीएमपीएमएलच्या आगारात ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अशा प्रकारची कोणतीच मोहीम शहरात राबविण्यात आलेली नाही.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
वाहतूक पोलिसांकडे ऍप असल्याने कोणती रिक्षा किती वर्षापूर्वीची आहे याची माहिती मिळू शकते. मात्र वाहतूक पोलिसांच्या समोरून जाणाऱ्या या रिक्षांवर कारवाई होत नाही. कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलीस अगोदर जाहीर करतात. यामुळे कारवाईच्या काळात भंगार रिक्षा घरीच लावल्या जातात. पोलिसांनी अचानक आणि सातत्याने मोहीम राबविणे गरजेचे आहे.