मुंबई – आयपीएल स्पर्धेचा यंदाचा मोसम बीसीसीआयसाठी गेल्या दीड वर्षांतील करोनामुळे झालेल्या नुकसानभरपाईची जननी ठरणार आहे. बीसीसीआयला यंदाच्या स्पर्धेसह 2027 सालापर्यंतचे हक्क विकायचे असून त्यात स्टार इंडिया हा समूह इच्छुक आहे. या हक्कांच्या विक्रीतून बीसीसीआयला थोडेथोडके नव्हे तर तब्बल 45 हजार कोटी रुपये मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
2018 ते 2022 सालादरम्यान बीसीसीआयने ज्या किमतीला हे हक्क दिले होते, त्याच्या तीनपट जास्त रक्कम यंदाच्या करारातून मिळणार आहे. स्टार इंडियाने यापुढे हे हक्क 16 हजार 347 कोटींना विकत घेण्याची तयारी केली होती. त्यापूर्वी सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे 8 हजार 200 कोटींना हे हक्क दहा वर्षांसाठी दिले गेले होते. या तुलनेत 2018 साली स्टार इंडियाने जवळपास दुप्पट किमतीला हे हक्क विकत घेतले होते.
यंदाच्या स्पर्धेसाठीचा खेळाडूंचा लिलाव पुढील आठवड्यात होणार असून या लिलावाइतकीच चर्चा या हक्कांबाबत सुरू आहे. हे हक्क यंदा मिळवण्यासाठी दोन ते तीन वाहिन्यांचे समूह स्पर्धेत आहेत. सोनी स्पोर्टस नेटवर्क, डिज्नी स्टार नेटवर्क, रिलायन्स-वायाकॉम नेटवर्क हे समूह शर्यतीत आहेत.
आयपीएलचे टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रसारण हक्क चार वर्षांसाठी विकणार आहे. ई-ऑक्शनच्या माध्यमातून हे हक्क विकले जाणार असून त्यासाठी 10 फेब्रुवारीपूर्वी निविद मागवण्यात येणार आहेत.