नवी दिल्ली -माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. गरिबांसाठी आणि घरांकडे पायी निघालेल्या भुकेल्या स्थलांतरित मजुरांसाठी पॅकेजमध्ये काहीच नसल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात येणार असल्याचे सूतोवाच मंगळवारी केले.
त्याचा संदर्भ चिदंबरम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी सुमारे 3 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले. उर्वरित 16. 4 लाख कोटी रुपये कुठे आहेत? अधिक कर्ज घेऊन अधिक खर्च करण्याची गरज असताना सरकारची तसे करण्याची तयारी नाही. सरकारने राज्यांनाही तशी परवानगी द्यायला हवी. मात्र, तसे करण्यासही सरकार तयार नाही.
आर्थिक स्थितीत तळात असलेल्या देशातील 13 कोटी कुटुंबांच्या हाती मोदी सरकारने प्रथम पैसे देण्याची गरज आहे. त्या कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार रूपये देण्यासाठी सरकारला केवळ 65 हजार कोटी रुपये उपलब्ध करावे लागतील. सरकारने क्षेत्रनिहाय विचार करावा. प्रत्येक क्षेत्राला आर्थिक पाठबळ द्यावे, अशी भूमिकाही चिदंबरम यांनी मांडली.