बंगळुरू: भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या जगातील अनेक व्यवस्था भारतातून चालवीत असतात. त्यामुळे भारतातील आणि जगातील अनेक व्यवस्था चालविणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करू देण्याची मुभा मिळण्याची गरज असल्याचा युक्तिवाद या क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक टी व्ही मोहनदास पेै यांनी केला आहे.
भारतामध्ये करोना व्हायरसचा उद्रेक झाला आहे.त्यामुळे बऱ्याच कंपन्यातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले. सध्या मोबाईल, इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या चोख कामामुळे हे शक्य झाले आहे. यासाठी माहिती तंत्रज्ञान, इंटरनेट आणि मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना या परिस्थितीतही काम करू देणे गरजेचे झाले आहे. माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी तिची देखभाल आणि इतर कामे कार्यालयातून करणे गरजेचे असते. या यंत्रणा बिघडल्यानंतर केवळ भारतातीलच नाही तर अनेक जगातील माहिती-तंत्रज्ञान नियंत्रणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या र्मचाऱ्यांपैकी 25 ते 35 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने गेल्या तीस वर्षांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीमुळे केवळ भारतातीलच नाही तर जगातील माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा सुरळीत चालू आहेत. त्याचा सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. या कंपन्या सध्या ही हे काम अतिशय उत्तम पद्धतीने करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्राला काही प्रमाणात जीवनावश्यक क्षेत्र समजण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.
या क्षेत्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याची गरज नाही. त्यातील बरेच कर्मचारी घरातून काम करू शकतात. मात्र महत्त्वाच्या यंत्रणांची देखभाल रणाऱ्या 25 ते 35 टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. माहीती तंत्रज्ञान क्षेत्रातील 100 टक्के कर्मचारी घरातून काम करू शकत नाहीत. त्यातील काही कर्मचाऱ्यांना माहिती तंत्रज्ञान व्यवस्था चालविण्यासाठी कार्यालयातच जाणे गरजेचे असते. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.
जर ह्या महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनाही कंपनीत जाऊन काम करू दिले नाही तर बऱ्याच माहिती तंत्रज्ञान नियंत्रक यंत्रणा कोलमडू शकतात. त्याचा विमा कंपन्या, बॅंका इत्यादीवर परिमा होऊ शकतो, असे ते म्हणाले. जेव्हा एक – दोन महिन्यात परिस्थिती सुरळीत होईल ततेव्हा सर्व यंत्रणा तयार असण्याची गरज आहे. मात्र जर आता 25 ते 35 टक्के माहिती-तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाऊन काम करू दिले नाही तर नंतरही परिस्थिती प्रदिर्घ काळ अनुत्पादक राहू शकते, असे ते म्हणाले.