जालना – राज्यातील लसीकरण राहिलेल्या नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे. करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली, ही समाधानाची बाब आहे. तरी चौथ्या लाटेचा धोका टाळायचा असल्यास संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
जालना येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजेश टोपे म्हणाले, राज्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याबद्दल समाधान आहे. सर्वात महत्वाची आणि समाधानाची बाब ही आहे की नवीन केसेसची संख्या कमी झाली. राज्यामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 20 हजारांच्या खाली गेली आहे. एकेकाळी तिस-या लाटेत एकावेळी 48 हजार रुग्ण आढळत होते. काही लाखांमध्ये सक्रीय रुग्णसंख्या होती. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे आणि लसीकरणाचे प्रमाण खूप चांगले आहे, असे ते म्हणाले.
सध्या ज्यांचे लसीकरण राहिलेले आहे त्यांनी ते पूर्ण लसीकरण करुन घ्यावे. बुस्टर डोससाठी जे पात्र आहेत त्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी, अत्यावश्यक सेवेतील कामगार, पोलिसांनी बुस्टर डोस घेतला पाहिजे. 15 ते 18 वयोगटातील लोकांनाही लसीकरणाचा चांगला प्रतिसाद दिला. लसीकरण राहिलेल्यांनी तातडीने लसीकरण पूर्ण करावे. याचे कारण एकच आहे जर आपल्याला खऱ्या अर्थाने चौथी लाट येऊ द्यायची नसेल, सुरक्षित रहायचा असेल, तर लसीकरण करुन घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
जर आपल्या सर्वांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्रतिबंधात्मक शक्ती असेल तर निश्चित प्रकारे चौथ्या लाटेचा आपल्याला कुठल्याही प्रकारे अजिबात धोका असणार नाही, असेही राजेश टोपे यांनी ठामपणे सांगितले.