नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. त्यातच देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र येत त्यांच्या आघाडीने I.N.D.I.A. हे नवे नाव धारण केले. यामध्ये काँग्रेससह देशातील प्रमुख विरोधी पक्षांचा समावेश आहे. नुकतीच या गटाची एक बैठकही पार पडली. मात्र आता विरोधकांच्या या ‘इंडिया’ नावाच्या आघाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे नाव दिले आहे.
“विरोधकांची जी नवी आघाडी आहे ती आघाडी म्हणजे ‘इंडिया नाही तर घमंडिया’ आहे,” असे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. बिहारमध्ये एनडीएच्या खासदारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे नवे नाव विरोधकांच्या आघाडीला दिले आहे.
विरोधकांच्या आघाडीला जेव्हा इंडिया हे नाव देण्यात आलं तेव्हापासूनच या नावावर टीका होते आहे. सुरुवातीला या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हणाले होते की, युपीए हे नाव बदनाम झालं होतं म्हणून आता विरोधकांनी इंडिया हे नाव घेतले आहे. दुसरीकडे आता देशातली लढाई इंडिया विरुद्ध एनडीए अशी आहे असे काँग्रेसने जाहीर केले आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आघाडीवर टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
बिहारमधल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीश कुमारांवरही टीका केली. भाजपाने नितीश कुमार यांना तीन वेळा मुख्यमंत्री पद दिले. या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या जागा कमी झाल्या होत्या तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. एनडीएकडे त्याग भावना आहे आणि एनडीएच स्थिर सरकार देऊ शकते. एनडीएची साथ ज्यांनी सोडली ते सगळे स्वार्थी आहेत असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.