तळवडे, दि. 16 – तळवडे येथील जोतिबानगर परिसरात एक हजारांहून अधिक लघुउद्योजक आहेत. गेल्या काही महिन्यांपासून येथील उद्योजक विविध समस्यांचा सामना करीत आहेत. या भागात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच दोन पोलीस ठाण्याची हद्द येत असल्याने या चोरट्यांना आळा कोणी घालायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच परिसरात रेडझोनबाधित मोकळ्या जमिनी असल्यामुळे चोरट्यांचे फावले आहे.
भुरटे चोर दिवसभर भंगार गोळा करणे किंवा इतर विविध कारणाने परिसरात फिरत रेकी करतात. बंद असलेल्या किंवा इतर कंपन्यांच्या सुरक्षेचा अंदाज घेतात. कधी कधी आत जाऊन मालाची पाहणीही करतात. रात्रीच्या वेळी टेम्पो किंवा रिक्षा घेऊन येतात आणि माल चोरून नेतात. कमकुवत दरवाजे, सुरक्षा रक्षकांची कमतरता, स्ट्रीट लाईटचा अभाव, कमी उंचीचे कंपाऊंड, निकृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे या गोष्टींची रेकी करून चोरी केली जाते.
तळवडे येथील जोतिबानगर परिसर दोन पोलीस ठाण्यामध्ये विभागलेला असल्याने पोलिसांना व कारखानदारांना तक्रार करताना अडचणी निर्माण होत आहेत. वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील उद्योजकांमधून होत आहे. तसेच रात्रीच्या वेळी घरी जातानाही कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्यात येते.
पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार स्थानिक पोलीस उद्योजकांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना देत आहेत. पंरतु त्या सूचनांचे पालन करणे कारखानदारांना शक्य नसते. रात्रीच्या वेळी पोलिसांचे बिट मार्शल कर्मचारी गस्त घालतात.
मात्र पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी, अशी लघुउद्योजकांची मागणी आहे. तसेच महापालिकेने औद्योगिक परिसरातील रस्ते व पथदिवे सुस्थितीत ठेवावेत व लघुउद्योजक वसाहतीमधील प्रत्येक चौकामध्ये महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत, अशी मागणी यापूर्वीच येथील उद्योजकांनी उद्योगमंत्र्यांकडे केली आहे.