नवी दिल्ली: देशाच्या काही भागात उद्यापासून लॉकडाऊनमधील अटींपासून काही सवलती लागू होणार आहेत. पण या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या स्थलांतरीत मजुरांना मात्र यातील कोणतीच सवलत लागू नसल्याने त्यांना आहे तेथेच अडकून पडावे लागणार आहे. उलट केंद्र सरकारने सर्व राज्यांना आज जी सुचना पाठवली आहे त्यानुसार या मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊ देण्यास अनुमती देण्यात आलेली नसून त्यांना आहे तेथेच ठेवण्यात यावे असे स्पष्ट आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
हे मजुर ज्या ज्या क्षेत्रात अडकून पडले आहेत त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी त्यांची नोंदणी करून त्यांना त्या क्षेत्रातच काही काम देता येणे शक्य असल्यास द्यावे अशी सुचना त्यांना करण्यात आली आहे. केंद्र सरकारने उद्यापासून ग्रामीण भागातील उद्योग, बांधकामे, पाटबंधाऱ्यांची कामे, पाणी योजनांची काम आणि रोजगार हमींची कामे सुरू करण्यास अनुमती दिली आहे. अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजुरांना याचा लाभ घेता येऊ शकेल काय याची चाचपणी त्या त्या राज्यातील यंत्रणांनाच करण्यास सांगण्यात आले आहे, पण या मजुरांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यास मात्र पुर्ण प्रतिबंध लागू असेल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या मजुरांची स्थिती येत्या 3 मे पर्यंत तरी आहे तशीच राहणार आहे.
राज्याअंतर्गत ज्या मजुरांना आपल्या कामाच्या मूळ जागी जायचे आहे त्यांना जाण्यास अनुमती देण्यात आली आहे पण त्यासाठी त्यांची पुर्ण तपासणी आणि चाचणी केली जावी अशी सुचना संबंधीतांना करण्यात आली आहे.