पिंपरी -कंपनीच्या माहितीची अफरातफर करून कंपनीकडे येणारी कामे स्वतःच्या कंपनीकडे वळविली. त्याद्वारे कामगारांनी कंपनीची साडेचार कोटींची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी फेज वन मधील एस जी एस टेलिकॉम लिमिटेड या कंपनीत घडला.
वामन नारायण वाघ (वय 42, रा. चौधरी पार्क, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संजय सुरेश बारी (वय 34, रा. ताथवडे), दिनेश शर्मा (रा. नवी मुंबई), अरुण कुमार के एन (रा. श्रीगंधनगर, बेंगलोर), महिला कर्मचारी (रा. जळगाव), गणेश विठ्ठल पाटील (रा. जळगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी संजय बारी, अरुण कुमार, दिनेश शर्मा हे फिर्यादी यांच्या कंपनीत विविध पदांवर काम करत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या व नातेवाइकांच्या नावे जळगाव आणि अमेरिका येथे दुसरी कंपनी स्थापन केली. फिर्यादी यांच्या कंपनीकडे येणारी कामे आरोपींनी स्वतःच्या कंपनीकडे वळविले. त्यासाठी फिर्यादी यांच्या कंपनीतील माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित डेटाची अफरातफर केली. कंपनीच्या करारातील अटींचा व विश्वासार्हतेचा भंग केला. सुमारे साडेचार कोटी रुपयांची कामे आरोपींनी त्यांच्या कंपनीकडे वळवली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.