मुंबई – राज्यात काही दिवसांपासून करोना नियंत्रणात असल्याने करोनचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयेही ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले आहेत. मात्र अजूनही राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस सुरु करण्यात आले नव्हते. मात्र आता उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यासंबंधीची घोषणा केली आहे.
राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी ट्विट करून दिली आहे. यामुळे दोन वर्षांपासून ओस पडलेले युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार आहेत.
सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि त्या अंतर्गत येणारे कॉलेजेस आणि विद्यापीठं बंद होते. मात्र आता करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे कमी झाला असून नियमही हटवण्यात आले आहेत. म्हणूनच आता सर्व युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याचे आदेश उदय सामंत यांनी दिले आहेत.
यामुळे करोनाचे सर्व नियम पाळून आणि करोना प्रतिबंधक उपाय योजना पाळून राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालय पुन्हा सुरु करावीत असा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे करोना लसीचे दोन्ही डोस झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये ऑफलाईन पद्धतीने उपस्थित राहता येणार आहे. मात्र ज्यांनी अजूनही करोना लस घेतली नाही अशा विद्यार्थ्यांना उपस्थित राहता येणार नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.