मुंबई – काही लोकांना भाव देण्याची गरज नाही. तिथे त्यांना एक-दीड वर्ष झाले, पण भाव मिळत नाही. मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना स्थान मिळाले नाही. गद्दारांना आता त्यांची किंमत कळली असेल, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाट यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
आदित्य म्हणाले, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत त्यांनी केलेल्या विधानाचाही निषेध आहे. अशी सडक्या विचारांची माणसे राजकारणात टिकली कशी? हा प्रश्न पडतो आणि दु:खही होते. पण जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल.
“काल नाणारबाबत एका भाजप नेत्याने विधान केले. नाणारला कोकणवासिय आणि स्थानिक लोकांनी विरोध केलेला म्हणून आम्ही त्यांच्यासोबत, जनतेसोबत उभे राहिलो आहोत. कदाचित भाजप नेत्यांना सर्वच कोकणवासियांना देशद्रोही म्हणायचे असेल, तसे त्यांच्या मनात असूही शकते. त्यामुळे भाजपच्या मनातील महाराष्ट्र द्वेष स्पष्ट आहे, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगाविला.