पुणे – ह.भ.प. बंडातात्या कराकडकर नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी राजकीय नेत्यांच्या मुलांबद्दल तसेच महिलांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले होते. तर पुन्हा एकदा बंडा तात्यांची जीभ घसरली. स्वातंत्र्य सैनिक भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच्या शहीद दिनी ते पुण्यातील खेड राजगुरूनगर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसावादामुळे नाहीतर क्रांतिकारकांमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत, असे वादग्रस्त विधान केले.
ते भाषण देतांना पुढे म्हणाले,’भगतसिंहानी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. त्यावेळी सुरुवातीला भगतसिंहांवर महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींचा अहिंसावाद भगतसिंहांच्या मनामध्ये ठासवला होता. आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायचं आहे, पण भगतसिंहांचा हा भ्रमाचा भोपळा तीन वर्षातच फुटला. आणि पुढे साल 1922ला एक हत्याकांड झालं, त्या हत्याकांडात त्याला समर्थन देण्यात महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा भगतसिंह महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही ही पक्षपातीच आहेत. पण त्या विषयात आत्ता आपण घुसायचं काही कारण नाही ‘
दरम्यान, भारताला मिळालेलं स्वातंत्र्य अहिंसेच्या मार्गाने नव्हे तर क्रांतिकारक चळवळीने मिळालं. हे पटवून देताना बंडातात्या कराडकरांनी महात्मा गांधींचा उल्लेख म्हातारा असा केला. ते म्हणाले,’भगतसिंहांच्या मनावर हा परिणाम झाला, की आता या म्हाताऱ्याच्या ‘या’ मार्गाने जायचं काही कारण नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. हे उपयोगाचं नाही, कारण लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आहे. या म्हाताऱ्याच्या पद्धतीनं जर स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर एक हजार वर्षे लागतील.’ असे अशी वादग्रस्त विधान त्यांनी केली आहे.