नवी दिल्ली – झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या अटकेला आव्हान दिले आहे. त्या प्रकरणावर उद्या (शुक्रवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने बुधवारी रात्री सोरेन यांना अटक केली. त्यानंतर सोरेन यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अटकेची कारवाई अवैध ठरवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे.
केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या ईडीने सर्व अधिकारांचा गैरवापर केला आहे. त्या यंत्रणेने झारखंडमधील लोकनियुक्त सरकार अस्थिर करण्याच्या उद्देशातून अयोग्य पद्धतीने कारवाई केली, असे आरोपही याचिकेत करण्यात आले आहेत. दरम्यान, झारखंडच्या रांचीमधील विशेष न्यायालयाने सोरेन यांची रवानगी एक दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत केली.
ईडीने सोरेन यांना १० दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली आहे. त्यावरील निर्णय विशेष न्यायालयाने शुक्रवारसाठी राखून ठेवला. सोरेन यांना सध्या रांचीमधील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे. त्यांच्या अटकेमुळे झारखंडमधील वातावरण ढवळून निघाले आहे.