बांदा – देशात आत्महत्येचे प्रमाण झपाट्याने वाढलं आहे. उत्तर प्रदेशातील बांदा येथील एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजतं. विशेष म्हणजे या महिलेच्या मुलीने मिस इंडिया ताज प्रिन्सेसचा क्राऊन जिंकला होता.
आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव, सुधा असून त्यांच्या मुलीचं नाव रिया रैकवार असं आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मृता सुधा यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलिस कारवाई करत नसल्याने त्यांनी आत्महत्या केली. तर पोलिसांनी या प्रकरणी वेगळीच माहिती दिली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, महिला एक खासगी बँक चालवत होती. या बँकेत एक फ्रॉड झाला. याची पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यामुळे चौकशीसाठी त्यांना पोलीस ठाण्यात बोलविण्यात आलं होतं.
दरम्यान कुटुंबीयांनी सांगितलं की, सुधा यांचा मुलगा गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. ती मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आली होती. मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. ज्यामुळे महिला मानसिक तणावात होती आणि पोलीस ठाण्यातून घरी गेल्यानंतर खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला आणि पोलिसांवर आरोप लावले.