मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ केली नाही. त्याचबरोबर आगामी काळातही मवाळ पतधोरण जाहीर करण्याचे संकेत दिल्यानंतर शेअर बाजारात सकाळी जोरदार खरेदी झाली. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात भरीव वाढ होऊन निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स कालच्या तुलनेत 381 अंकांनी उसळून 60,059 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 104 अंकांनी वाढून 17,895 अंकांवर बंद झाला.
रिझर्व्ह बॅंकेने महागाई वाढण्याची शक्यता असूनही व्याजदरात वाढ केली नाही. सलग आठव्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने विकासदर वाढण्यास चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे किमान दोन महिने तरी कमी व्याजदरावर भांडवल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उद्योगांची उत्पादकता वाढेल म्हणून गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली असल्याचे रिलायन्स सिक्युरिटीजचे विश्लेषक विनोद मोदी यांनी सांगितले.
टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज ऑटो या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र गुंतवणूकदारांनी हिंदुस्थान युनिलिव्हर, मारुती, टायटन, कोटक बॅंक या कंपन्यांच्या शेअरची विक्री केली.
व्याजदरात वाढ होणार नसल्यामुळे बॅंकांच्या शेअरची घसरण झाली तर वाहन क्षेत्राच्या शेअरची खरेदी झाली. जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश देऊनही रिझर्व्ह बॅंकेने सकारात्मक पतधोरण जाहीर केल्यामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही शेअर बाजारात खरेदी झाली असल्याचे सांगण्यात आले. बाजार बंद झाल्यानंतर टीसीएस कंपनीचा ताळेबंद जाहीर जाणार होणार आहे. या कारणामुळे गेल्या आठवड्यात माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली आहे.