मंत्रीमंडळात आढळराव पाटलांना संधी मिळाल्यास उर्जितावस्था शक्य
रमेश जाधव
रांजणी-नुकत्याच पार पडलेल्या 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शिवसेनेला सर्व जागा गमावत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेच्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील खेड आणि जुन्नर तालुक्यातील विधानसभेच्या जागा देखील केवळ बंडखोरीमुळे गमवाव्या लागल्या असल्या तरी राज्यात पुन्हा एकदा महायुतीला जनादेश मिळाला आहे.
आता पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे बळकटीकरण करायचे असेल तर शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना सत्तेतील महत्वाचे पद मिळावे, यासाठी जिल्ह्यातील सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोर धरला आहे.
जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने शिवसैनिकांमध्ये मरगळ आहे. त्यामुळे शिवसेनेला उर्जित अवस्था प्राप्त करायची असेल तर राज्यात आगामी होणाऱ्या सत्ता स्थापनेत शिवसेना उपनेते तथा माजी खासदार यांना मंत्रीपद मिळावे, अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अपेक्षा बाळगली आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आतापासूनच आढळरावांना महायुतीच्या सत्तेतील महत्वाचे पद मिळविण्यासाठीची फिल्डींग लावणे सुरू केले आहे.
जिल्ह्यात शिवसेनेने आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी केल्याचे चित्र 2019च्या विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाले. बंडखोरीमुळे शिरुर लोकसभा मतदार संघातील हक्काच्या असलेल्या जुन्नर आणि खेडच्या आमदारकीच्या दोन जागाही सेनेला गमवाव्या लागल्या. तर पुरंदरची जागा शिवतारे यांच्या अतिआत्मविश्वासामुळे गमवावी लागल्याचे बोलले जात आहे. माजी खासदार आढळराव पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न केले. मात्र दुदैवाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्या रुपाने सक्षम नेतृत्व मिळाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आढळरावांना खासदारकीच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आणि तेथुन पुढे खऱ्या अर्थाने शिवसेनेच्या संघटन आणि सर्वांगीण विकासाला खिळ बसली. भविष्यात पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना पक्षाचे बळकटीकरण करायचे असेल तर महायुतीच्या सत्तास्थापनेत शिवसेना पक्ष नेतृत्वाने आढळरावांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी जिल्ह्यातील निष्ठावंत आणि जुन्या जाणत्या शिवसैनिकांकडून होऊ लागली आहे.
- “चिअरअप’ करण्याची गरज
लोकसभेतील पराभवाने आढळराव पाटील खचून न जागा उलट त्यांनी जिल्ह्यातील विशेषत: शिरुर लोकसभा मतदार संघातील पक्षसंघटना बळकटीकरणाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार आढळराव पाटील यांनी मतदार संघात जनसंपर्कही मजबूत ठेवला आहे. दुदैवाने आढळरावांच्या जनसंपर्क मोहिमेला आणि पक्ष संघटना बळकटीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात यश येत नसल्याने जिल्ह्यातील शिवसेना पक्ष “चिअरअप’ होत नसल्याचे चित्र सध्यातरी पहावयास मिळत आहे.