नवी दिल्ली – सध्या दिल्लीसह उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. दिल्लीमध्ये यमुना नदीचा पूर काही प्रमाणात ओसरला असल्यामुळे रस्त्यांवर वाहतूक सुरु झाली आहे. युपीमधील काही भागात मात्र अद्याप पाणी साठलेले आहे. अशात मुझफ्फरनगरमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. संजीव बालियान यांच्या गावाला सिसौली आणि शामलीला जोडणारा रस्ता हिंडन नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने वाहून गेला.
केंद्रीय मंत्र्यांचे गाव कुटबा-कुटबी आणि हडौली गावादरम्यान असलेल्या हिंडन नदीच्या पुलाजवळील सिसौली-काकडा रस्ता पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेला आहे. यामुळे जवळपास 15 गावांची वाहतूक ठप्प झाली आहे. हा मार्ग मुझफ्फरनगर-बरौत रस्त्यावरून काकडा, हदौली, सिसौली, भाऊराकलन मार्गे शामलीकडे जातो. रस्त्याचं पुरात गेल्याने आसपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
शेतकरी अडचणीत
हिंडण नदीतील पाणी वाढल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. मुझफ्फरनगरच्या चारथावलमध्ये नदीकाठच्या 10 गावांमध्ये 10,000 हेक्टरपेक्षा जास्त पीक नष्ट होण्याचा धोका आहे. बुधाखेडा गावात सिमेंट व्यापाऱ्याची चार दुकाने कोसळल्याने सुमारे लाखोंचे नुकसान झाले. सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
बुधाखेडा हे सहारनपूरच्या सीमेला लागून असलेल्या चारथावल भागातील पहिले गाव आहे. याशिवाय छिमाऊ, कसौली, दुधली, न्यामू, सिकंदरपूर, अकबरगड, नांगला राय, पिपलशाह आणि कुऱ्हेडी ही गावे नदीच्या काठावर वसलेली आहेत. ऊस, भात, गवत, ज्वारी, बाजरी, भाजीपाला पिके पुराच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त होऊ लागली आहेत. कसौली गावाला लागून असलेल्या सहारनपूर जिल्ह्यातील जाखवाला ते न्यामूपर्यंत सुमारे पाच किमीच्या परिघात हिंडन नदीचे पाणी वेगाने वाहत आहे.