सातारा – आरोग्य विभागांतर्गत विविध पदांसाठी मार्च 2019 मध्ये होणारी भरती करोना संकटामुळे स्थगित करण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही भरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार दि. 8 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधित भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. दि. 15 व 16 ऑक्टोबरला परीक्षा होणार आहे.
आरोग्य विभागातील पाच संवर्गाच्या विविध पदांसाठी मार्च 2019 मध्ये भरती होणार होती. ही प्रक्रिया राबविण्यासाठी विभागीय स्तरावरुन एजन्सीची नेमणूकही केली होती. मात्र, करोना प्रादुर्भावाने भरती प्रक्रिया रखडली. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नेमण्यात आलेल्या एजन्सी व इतर सर्व प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने एजन्सी नेमण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार आरोग्य विभागातील गट “क’ मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक आदी पदांसाठी भरती होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.
यामध्ये दि. 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर बिंदू नियमावली अंतिम करणे, 16 सप्टेंबरअखेर भरती प्रक्रियेसाठी विभागीय स्तरावरुन कंपनीची नियुक्ती करणे, 17 ते 22 सप्टेंबर निवड केलेल्या कंपनीने न्यास कंपनीकडून डेटा हस्तांतर करणे, 23 ते 27 सप्टेंबर कंपनीने संवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस सांगणे, 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणे, 5 ते 10 ऑक्टोबर जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करुन संबंधित उमेदवारांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन देणे, 15 ऑक्टोबर परीक्षेचे आयोजन (ऑनलाईन पध्दतीने) आरोग्य पर्यवेक्षक सकाळी 11ते 1, औषध निर्माता दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, 16 ऑक्टोबर आरोग्य सेवक सकाळी अकरा ते एक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ दुपारी तीन ते सायंकाळी पाच, 17 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत परीक्षेची उत्तरपत्रिका प्रसिध्द करणे व अंतिम यादी प्रसिध्द करुन नियुक्तीचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट “क’ मधील विविध पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया 2019 मधील आहे. त्यावेळी परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकृती करुन घेण्यात आली होती. त्यामुळे आता नव्याने अर्ज भरुन न घेता त्या वेळचे उमेदवार गृहीत धरुन भरती होणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.