मुंबई – मुंबईत रेल्वेच्या जागांवर झोपडपट्ट्या आहेत. त्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी राजकीय पक्ष नेत्यांच्या भेटी घेत आहे. त्यानुसार मी राज ठाकरे यांची भेट घेतली, अशी भुमिका केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी मांडली.
दानवे यांनी शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. नितीन गडकरींपाठोपाठ दानवे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक अटकळी बांधण्यात येत आहेत.
राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखत आहे. मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज ठाकरे बोलले तर आघाडीमधील नेत्यांना चांगले वाटते, पण जर त्यांच्याविरोधात बोलले तर मात्र त्यांच्या पोटात दुखते. एखाद्याच्या कामामुळे त्याच्याबद्दलचे मत बदलू शकते. मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. परंतु आज त्यांच्यावर टीका केली, तर ते नाव ठेवायला लागले. अलिकडे झालेल्या निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्ये आम्ही जिंकली, त्याचं कौतुक फक्त राज ठाकरेंनी केले. चांगल्या कामाचं कौतुक नको का करायला? असा प्रश्न रावसाहेब दानवेंनी विचारला.
राज ठाकरेंनी त्यांचं परप्रांतीयांबद्दलचं धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही मुद्दे सोडून द्यावे लागतात, असे दानवे म्हणाले.