बेल्हे – परतीच्या मुसळधार पावसामुळे पेमदरा (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे; परंतु त्यांचे दुष्परिणाम अद्यापही शेतकऱ्यांना सोसावे लागत असून त्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडले आहे.
बाजरी, मूग, सोयाबीनचे पीक पावसाने वाया गेलेच पण काही शेतकऱ्यांच्या शेतात उरला सुरलेला कांदाही सडू लागला आहे. आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? आमच्या गावावर अन्याय का? अशी विचारणा शेतकऱ्यांकडून होत आहे. गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बांगरवाडी गावचे सरपंच जालिंदर बांगर, पेमदराचे माजी सरपंच आनंदा बेलकर, पेमदरा गावचे शेतकरी ज्ञानदेव बेलकर, चंद्रकात बेलकर, संतोष बेलकर, सखाराम दाते, बाळू बेलकर, संभाजी दाते, शंकर दाते, संभाजी बेलकर, अनिल दाते, विलास दाते, रामदास बेलकर, बापू दाते, सावकार बेलकर, राजू दाते, भाऊ दाते, प्रशांत दाते, सतीश दाते, गंगाराम बेलकर, आदेश बेलकर, पोपट दाते, रखमा दाते, नवनाथ दाते, बाळू दाते, दिलीप दाते, रत्नाकर दाते, किसन दाते आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
बांगरवाडी गावातही अशीच परिस्थिती असून बांगरवाडी, गुळुंचवाडी, अणेपठार भागावरील गावांमध्ये हीच परिस्थिती असून या गावाचे पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पिकाचा पंचनामा अद्यापही करण्यात आलेला नाही. गावतील 75 टक्के क्षेत्र खराब झाले असून प्रशासनाने पंचनामे करावेत.
– आनंदा बेलकर, माजी सरपंच, पेमदरा
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे बांगरवाडी व पेमदरा या दोन गावांचे पंचनामे करण्याची विशेष मागणी करणार आहे.
– अतुल बेनके, आमदार, जुन्नर