पुणे – परंपरेने लादलेले शोषण, अन्याय, अत्याचार याविरुद्ध जिजाऊ-सावित्री-रमाई यांनी सातत्याने संघर्षपूर्ण लढाई उभी केली. परिणामी रयतेचे राज्य निर्माण झाले. प्रत्येक स्त्रिला शिक्षण मिळू लागले. यातील सेवाभावी वृत्ती, त्याग, समर्पण आणि लोकनिष्ठा ठेवल्यानेच येथे परिवर्तन घडल्याचे दिसते.
मात्र सद्यःस्थितीत पुरागामी विचारांनी काम करणाऱ्या संघटना, सत्तेपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मात्र, सातत्याने सत्तेच्या खुर्च्या मिळत गेल्याने गोर-गरीबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न अधिकाधिक तीव्र होताना दिसतात. त्यामुळे शोषित, वंचितांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संघटनांमध्ये सत्ता बदलाची ताकद आली पाहिजे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.
रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने दिला जाणारा जिजाऊ-रमाई समाजभूषण पुरस्कार यंदा मुक्ता दाभोलकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. हा पुरस्कार ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे, रावसाहेब पटवर्धन महाविद्यालयाच्या प्राचार्या वृंदा हजारे, गोविंद साठे, रामचंद्र निंबाळकर उपस्थित होते. तर, परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
उल्हासदादा पवार म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या समाज सुधारणेचा वारसा मुक्ता दाभोलकर समर्थपणे चालवत आहेत. जिजाऊ-रमाई पुरस्कारासाठी त्यांची निवड अगदी यथोचितच आहे.
सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. यशस्वीतेसाठी केंद्रीय कार्यालय सचिव दीपक पवार, अपर्णा साठे, गिरीश घाग, नम्रता पवार, दिव्या कोंतम, यशस्वीनी नवघणे, उमा नवघणे, गिता साका, मिना शिंदे, सुरेखा कुसाळकर, ज्योति वाघमारे, माऊली जाधव, विकास साठे यांनी परिश्रम घेतले.