निर्णयाचा पुनर्विचार होणे गरजेचे : संदीप कुंभार
मायणी (प्रतिनिधी) – कुंभार समाजाचा मुख्य व्यवसाय हा मूर्ती बनविण्याचा आहे. करोनामुळे अनेक गावांमध्ये सध्या “एक गाव एक गणपती’ उपक्रम राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कुंभार समाज आर्थिक अडचणीत येणार असल्याने संबंधित विभागाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी कुंभार समाज विकास संस्थेचे खटाव तालुकाध्यक्ष संदीप कुंभार यांनी केली आहे.
ते म्हणाले, कुंभार समाजातील अनेक कुटुंबे वर्षातील सहा महिन्यांहून अधिक काळ मूर्ती बनवितात. या मूर्तींचे काम साधारणत: फेब्रुवारी-मार्चपासून सुरू होते. त्यासाठी लागणारा कच्चा माल बाजारपेठेतून विकत घ्यावा लागतो. सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या मूर्ती पेण, कोल्हापूर, उंब्रज आदी भागातून अनेक समाजबांधव खरेदी करतात.
कच्च्या मूर्ती आकर्षक रंगरंगोटी करून बाजारपेठेत विकायला आणतात. वर्षातील सहा महिने हा उद्योग सुरू असल्याने सध्या या मूर्ती पूर्ण रंगरंगोटी करून विक्रीसाठी तयार आहेत. अशा वेळी “एक गाव एक गणपती’ची प्रक्रिया अनेक गावांमध्ये सुरू आहे. शासनाच्या नियम व अटींनुसार अनेक समाजबांधवांनी सार्वजनिक मंडळांसाठी तीन ते चार फुटापर्यंत मूर्ती तयार केल्या आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांनी कुंभार समाजबांधवांकडे मूर्ती आरक्षित केल्या आहेत. अशा स्थितीत “एक गाव एक गणपती’ उपक्रम सक्तीने राबवल्यास या मूर्ती तशाच पडून राहतील.
अनेकांनी घरगुती व सार्वजनिक मंडळांसाठी हजारो गणेशमूर्ती केल्या आहेत. कुंभार बांधवांनी कच्चा माल चढ्या दराने विकत घेतला आहे. “एक गाव एक गणपती’ उपक्रमाचा निर्णय चार-पाच महिन्यांपूर्वी घेणे गरजेचे होते. आत्ता मूर्ती बनवण्याचे काम पूर्ण झाल्याने कुंभार समाज आर्थिक संकटात सापडेल. त्यामुळे संबंधित विभागाने या निर्णयावर पुनर्विचार करणे गरजेचे आहे.