पाटणा – पाटणा शहराच्या मध्यभागी असलेला ऐतिहासिक सुलतान पॅलेस पाडण्याच्या बिहार सरकारच्या प्रस्तावामुळे इतिहासकार, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षक आणि सामान्य नागरिकांना धक्का बसला आहे त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. उलट हे स्थळ अधिक संरक्षित करण्याची गरज आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.
नितीश कुमार सरकारने अलीकडेच हा निर्णय जाहीर केला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बीअरचांद पटेल रोडवरील 100 वर्षे जुन्या सुलतान पॅलेसच्या जागेसह पाटणामधील तीन ठिकाणी पंचतारांकित हॉटेल बांधण्यास मान्यता दिली आहे. हा निर्णय जाहीर होताच, सोशल मीडियावर त्याचा निषेध सुरू झाला, अनेक नागरिकांनी याला “एकदम धक्कादायक” आणि सडक्या विचारांचा निर्णय असे म्हटले आहे.
बिहार सरकारने काही वर्षांपुर्वी या हॉटेलचे रूपांतर हेरिटेज हॉटेल मध्ये करण्याचा निर्णय घेतला होता तो निर्णय का बदलला असा सवालही त्यांनी केला आहे. देशाच्या विविध भागांतील सामान्य नागरिक, अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, पाटण्यातील हा शेवटचा ऐतिहासिक सुलतान पॅलेस पाडू नये आणि त्याऐवजी हवेतर त्याचे हेरिटेज पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर करावे.
ऐतिहासिक गार्डिनर रोड (आता बीअर चांद पटेल रोड) वर असलेला हा राजवाडा 1922 मध्ये पाटणा येथील दिग्गज बॅरिस्टर सर सुलतान अहमद यांनी बांधला होता, त्यांनी पाटणा उच्च न्यायालयात काही काळ न्यायाधीश म्हणूनही काम केले होते. आणि 1923 ते 30 या अवधीत त्यांनी पाटणा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही काम पाहिले. नंतर ते कायदा आणि माहिती आणि प्रसारणासाठी व्हाइसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य बनले. महात्मा गांधींसोबत 1930 मध्ये लंडनमध्ये झालेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेसाठी निवडल्या गेलेल्या भारतीय शिष्टमंडळातही त्यांचा सहभाग होता.
पाटणा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आरबीपी सिंग यांनी हा प्रतिष्ठित राजवाडा पाडण्याचा निर्णय “एकदम धक्कादायक” आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. सुल्तान पॅलेससारख्या वास्तुशिल्पाचा दागिना आणि ऐतिहासिक वास्तू उध्वस्त करण्याचा विचारही कोणी कसा करू शकतो असा सवाल त्यांनी केला आहे. दिल्लीस्थित प्रख्यात इतिहासकार स्वप्ना लिडल आणि एस इरफान हबीब यांनीही पंचतारांकित हॉटेलसाठी राजवाडा पाडण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.