मुंबई – शेअर बाजाराकडे किरकोळ गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. मुंबई शेअर बाजाराने जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 148 दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजारात नवे एक कोटी गुंतवणूकदार आले. त्यामुळे मुंबई शेअर बाजारात शेअरचे व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या 12 कोटींवर गेली आहे.
शेअर बाजाराने सांगितले की, 12 कोटी गुंतवणूकदारापैकी 42 टक्के गुंतवणूकदार 30 ते 40 वयोगटातील आहेत. 23 टक्के गुंतवणूकदार 20 ते 30 वयोगटातील आहेत. तर 11 टक्के गुंतवणूकदार 40 ते 50 वयोगटातील आहेत. याचा अर्थ तरुण गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे मोठ्या प्रमाणात वळत असल्याचे दिसून येते.
गुंतवणूकदारांच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असून 12 कोटी गुंतवणूकदारांपैकी तब्बल 20 टक्के गुंतवणूकदार एकट्या महाराष्ट्रातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील गुजरातचे दहा टक्के गुंतवणूकदार आहेत तर उत्तर प्रदेशातील नऊ टक्के गुंतवणूकदार आहेत. राजस्थान आणि तामिळनाडूतील गुंतवणूकदार प्रत्येकी सहा टक्के इतके असल्याचे शेअर बाजाराने म्हटले आहे.
यातील किती गुंतवणूकदार फक्त म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात, त्याचबरोबर यातील किती खाती सक्रिय आहेत याची माहिती मुंबई शेअर बाजाराने दिली नाही. मुंबई शेअर बाजाराची स्थापना 1875 साली झाली होती. त्यावेळी या शेअर बाजाराचे नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे होते. शेअरच्या खरेदी -विक्री शिवाय मुंबई शेअर बाजारामध्ये कर्जरोखे, डेरिव्हेटिव्ह, करन्सी डेरिव्हेटिव्ह, इंटरेस्ट डेरिव्हेटिव्ह, म्युच्युअल फंडाचे व्यवहार होतात.