हेळगाव – करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व प्रकारची कॉलेज सुरू झाली असून बहुतांशी कॉलेजच्या वेळा या सकाळच्या आहेत. कराड मसूर मार्गावर मसूर सह कॉलेजच्या थांब या पर्यंत 6 बसथांबे असून शिरवडे, शहापूर, सह्याद्री कारखाना, नडशी, दत्तनगर, कोपर्डे अशा छोट्या मोठ्या गावातून शेकडो मुले मुली या मार्गावरून शिक्षण घेण्यासाठी कराडला जातात.
कराड आगारा बरोबरच कोरेगाव आगाराच्या बसच्या फेऱ्या ही या मार्गावर चालू असल्या तरी महत्त्वाचे सेवा चालू आहे ती काले मसूर या बसची. ही बस जेव्हापासून सुरू झाली तेव्हा पासून या मार्गावरील प्रवाशी वर्गात आनंदाचे वातावरण असून त्यास मुलासह प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची होणारी हाल ही थांबले.
यामुळे ही सेवा अल्पावधीत नावारूपास आली. करोनाच्या कठीण काळानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कॉलेज बरोबर सर्व बाजारपेठे ही सुरू झाल्याने पुन्हा एकदा काम धंदा नोकरी व शिक्षणाच्या निमित्ताने प्रवासी बाहेर पडू लागले आणि परस्थिती जवळपास पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू झाल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या बससेवाही चालू करण्यात आल्या.
परंतु बसच्या फेऱ्याच्या वेळा जरी बरोबर असल्या तरी सकाळच्या फेऱ्यात वाढ करणे गरजेचे आहे. कारण मुख्य गाव मसूर मधूनच येणाऱ्या बस फुल भरून येत असल्याने शहापूर, कारखाना, नडसी, कोपर्डे या गावावरून कराडकडे जाणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थ्यांना बस थांबत नसल्याने खाजगी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे बसचा मासिक पास काढून ही उपयोग होत नाही. याशिवाय वेळेवर कॉलेजला ही पोहोचू शकत नसल्याने आर्थिक त्याचबरोबर शैक्षणिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत आहे.
यासाठी बसफेऱ्या वाढवणे विद्यार्थ्यांबरोबर प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी या परिसरातून होत आहे. या मार्गावर कोरोगाव आगारची बस ही धावते पण ती लांब पल्यावरून येत असल्याने त्यात अगोदरच गर्दी असते त्यामुळे ही बस बऱ्यापैकी ह्या थांब्यावर थाबत नाही. आणि येणारी बस जरी थांबली तरी गर्दीचा त्रास देखील होत असून करोनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे.
आणि जाणीवपूर्वक आपण तिसऱ्या लाटेस निमंत्रण तर देत नाही ना अशीही शंका प्रवाशांच्या मनात येत असल्याने बसच्या फेऱ्या वाढून होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी पालकांसह विद्यार्थ्यांनी प्रवासी करत आहेत.