पिंपरी, दि. 25 – महापालिकेच्या दापोडी येथील मैला शुध्दीकरण केंद्राद्वारे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. याची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी पर्यावरण प्रेमी व आम आदमी पक्षाचे रविराज काळे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने दापोडी येथे 20 दशलक्ष लिटर क्षमतेचे मैला शुद्धीकरण केंद्र तयार केले आहे. मात्र, याठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. सांडपाणी थेट नदिपात्रात सोडले जाते. तसेच, मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांना सुरक्षा साधने दिली नाहीत. कामगारांच्या पायात बूट नाहीत, हॅंडग्लोज नाहीत. याबाबत संबंधित ठेकेदाराला अधिकारी जाब विचारत नाहीत. त्यामुळे ठेकेदाराची मनमानी सुरु झाली आहे. मैला शुद्धीकरण केंद्रातील कामगारांच्या आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सांडपाणी थेट नदिपात्रात सोडले जात असल्यामुळे नदिपात्रातील जीवसृष्टी धोक्यात आली आहे.