गेल्या महिनाभरात महाराष्ट्रात ज्या अभुतपूर्व उलथापालथी झाल्या त्यातून उद्भवलेली राजकीय अस्थिरता नुकतीच संपुष्टात येऊन, राज्यात एका नव्या आघाडी सरकारचा उदय झाला आहे. या महिनाभराच्या काळात पडद्यामागे घडलेल्या साऱ्या घडामोडींच्या संबंधात विस्तृत खुलासे करणारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक मुलाखत काल एका वाहिनीवर प्रसारित झाली आहे. या मुलाखतीतून पवारांनी जो घटनाक्रम उलगडला आहे, त्यातून त्यांच्या अंगी असलेल्या राजकीय प्रगल्भतेचा उत्तुंग आविष्कारच जाणकारांच्या निदर्शनाला आला आहे. पवारांनी या मुलाखतीत बरेच मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे त्याचे कवित्व बरेच दिवस रंगणार आहे.
मुळात भाजप आणि शिवसेनेचे संबंध तुटल्यानंतर राज्यात नेमके काय होणार, याचा अंदाज कोणालाही लागत नव्हता. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन भिन्न विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करण्याचा पर्याय समोर आला पण त्यात अनेक अडचणी होत्या. त्या अडचणींचे टप्प्याटप्प्याने कसे निराकरण केले गेले, याचे भाष्य या मुलाखतीत खुद्द पवारांनीच केले आहे. या घडामोडींमध्ये अपेक्षेनुसार मोदी-शहांनी पवारांभोवती आपले जाळे टाकून, त्यांना आपल्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता, या वस्तुस्थितीची पवारांनी प्रथमच कबुली दिली आहे. महाराष्ट्रासारखे “श्रीमंत राज्य’ हातात ठेवण्यासाठी भाजपपुढे तोच एक पर्याय होता. महाराष्ट्रातील अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या संबंधात मदत मागण्याच्या निमित्ताने मोदी-पवार यांची भेट झाली. किंबहुना ती घडवली गेली असण्याचीही शक्यता आहे. त्यात मोदींनी पवारांना “आपण आता एकत्र काम केले पाहिजे,’ असा प्रस्ताव देत, त्यांना खुली ऑफर दिली होती.
खुद्द पंतप्रधानांनीच दिलेली ही लाभदायी ऑफर सहजपणे नाकारणे पवारांना निश्चित अवघड गेले असावे; पण आपण कोणत्या शैलीने त्यांची ही ऑफर नाकारली, याचाही तपशील या मुलाखतीत पवारांनी सादर केला आहे. त्यावेळी पवारांनी मोदींकडे जे प्रतिपादन केले, तेही एका प्रगल्भतेचेच प्रमाण आहे. “आपली व्यक्तिगत मैत्री कायम राहीलच; राष्ट्रीय हिताच्या प्रश्नावर यापुढेही मी आपल्याला सहकार्य करीत राहीन; तथापि महाराष्ट्रातील निवडणूक काळात आम्ही जी भूमिका घेतली होती, त्यातून तुमच्या बरोबर येण्यात मला अडचण आहे,’ असे मोदींना समजुतीच्या स्वरात सांगून त्यांनी तो विषय हातावेगळा केला. दुसरीकडे, कॉंग्रेस नेतृत्व शिवसेनेबरोबर जाण्यास काहीसे नाखूश होते. पण पवारांनी आपण सोनियांचीही कशी समजूत घातली, याचाही खुलासा यात केला आहे.
आणीबाणीच्या काळात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिराजींची केलेली पाठराखण, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने प्रणव मुखर्जी, प्रतिभाताई पाटील यांना (भाजपच्या विरोधात जाऊन) केलेले मतदान इत्यादी बाबी सोनियांच्या कानावर घालून, पवारांनी सोनियांना या संयुक्त सरकारसाठी तयार केले. कॉंग्रेसला शिवसेनेबरोबर जाण्यास राजी करण्याचे कौशल्यही पवारांच्याच लेखी जमा झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरची ही सारी जुळवाजुळव झाल्यानंतर शिवसेनेचे मुख्यमंत्रिपद कोणाकडे असावे, यातून दोन्ही कॉंग्रेसमध्ये मतभिन्नता होती. शिवसेनेच्या कोणातरी दुय्यम नेत्याच्या हाताखाली राज्य चालवण्यास दोन्ही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजी नव्हते. त्यातच खुद्द उद्धव ठाकरे हेही स्वत: मुख्यमंत्री बनण्यास तयार नव्हते. पण तरीही वडिलकीच्या नात्याने “आता मी तुम्हाला हे पद स्वीकारण्याचा आदेश देतो,’ अशा निर्वाणीच्या भाषेत सांगितल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनण्यास राजी झाले, ही महत्त्वाची घडामोडही पवारांच्या या मुलाखतीतून समोर आली. “तिन्ही पक्षांना एकत्र ठेवण्यासाठी आपलेच नेतृत्व उपयोगी ठरेल,’ हे उद्धव ठाकरे यांच्या गळी उतरवण्यातही पवारांचेच कसब कामी आले आहे, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
अन्यथा “मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदी बसवेन, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता,’ हेच पालुपद लावून धरणाऱ्या उद्धव ठाकरे यांना, त्यासाठी राजी करणे हे तसे सोपे काम नव्हते. तो विषयही निकाली निघाल्यानंतर सगळेच सुरळीतपणे जुळून आले असताना; आणि आता केवळ नवीन सरकारच्या शपथविधीची औपचारिकता बाकी असताना, अजित पवारांनी जी आगळीक केली, त्यातून या नव्या आघाडी सरकारच्या स्थापनेचे सारेच मनसुबे उधळले गेले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एका रात्रीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे, ही केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला अचंबित करणारी घटना होती. विरोधकांचे सारे मनोधैर्य खच्ची करण्याचे काम या शॉक ट्रिटमेंटद्वारे झाले होते. त्यातून सावरण्याचे काम कसबी हातानेच करावे लागणार होते. ती जबाबदारीही पवारांनी किती थंड डोक्याने पार पाडली, याची हकिकत महाराष्ट्राला खुद्द पवारांच्याच तोंडून ऐकायला मिळाली आहे.
“अजित पवारांनी फडणवीसांशीच हातमिळवणी करून सरकार स्थापन केले आहे, याची आपल्याला कल्पना नव्हती,’ असे पवार यात म्हणाले आहेत. यावर काहींचा अजूनही विश्वास बसणार नाही; पण तोही खुलासा पवारांनी यातून केला आहे.”अजित पवार हे आपल्याला कल्पना देऊनच फडणवीस यांना भेटायला गेले होते,’ हे पवारांनी या मुलाखतीत कबूल केले आहे. पण त्यावर त्यांचा या मुलाखतीतील खुलासा असा होता की, “फडणवीस मला काही महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून भेटायला बोलावत आहेत, मी जाऊ का?’ असे अजितदादांनी शरद पवारांना सांगितले होते. “राजकारणात संवाद तोडणे योग्य नाही अशी आपली भूमिका असल्याने मी त्यांना तशी परवानगी दिली होती; पण ते असे काही करतील असे वाटले नव्हते,’ असे पटणारे स्पष्टीकरण पवारांनी दिले आहे. त्यानंतरची घडामोड अधिक महत्त्वाची आहे. फडणवीस-अजित पवार शपथविधीने शिवसेनेत गोंधळ माजण्याची शक्यता असल्याने पवारांनी सर्वात आधी उद्धव ठाकरे यांना फोन करून, “राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवारांबरोबर नाही,’ असा भरवसा त्यांना दिला आणि या दोन्ही नेत्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद लगोलग घेऊन अजित पवारांच्या बंडाची हवा काढून घेतली. शिवाय, अजित दादांसमवेत शपथविधीला गेलेल्या तीन आमदारांनाही पवारांनी पत्रकार परिषदेत सादर करून “अजित पवारांबरोबर पक्षाचे आमदार तिकडे मोठ्या संख्येने गेलेले नाहीत; आणि जे गेले आहेत तेही परत येत आहेत,’ असे याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केल्यानंतर विरोधी गोटात निर्माण झालेली अस्वस्थता बऱ्याच अंशी कमी झाली.
नंतर खुद्द अजितदादाच राष्ट्रवादीच्या गोटात परतले. त्यानंतरचा सारा घटनाक्रम लोकांच्या समोर आहे. टीव्ही समोर बसून या साऱ्या घडामोडी सतत महिनाभर बघतानाही सामान्य लोकांची मोठीच दमणूक झाली पण या घडामोडींचे प्रमुख सूत्रधार राहून पवारांनी स्वत:ची दमणूक न होऊ देता किंवा मनोधैर्य खच्ची न होऊ देता हा सारा घटनाक्रम ज्या कौशल्याने हाताळला, त्यातून “राजकारणातला चाणक्य’नेमके कोणाला म्हणतात, याचे प्रात्यक्षिकच त्यांनी महाराष्ट्राला घडवले आहे. त्यांच्या अन्य कर्तबगारीची माहिती साऱ्या महाराष्ट्राला आहे, पण त्यांच्यातला चाणक्य नेमका कसा काम करतो हे प्रत्यक्ष शरद पवार यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी या मुलाखतीतून मिळाली आहे. त्यातून पवारांच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या प्रगल्भ राजकारणाचे प्रत्यंतर येते.