नवीन सरकार स्थापन झाले. माध्यमांमध्ये सुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी आमदारकीची शपथ घेतली. आणि निष्ठापूर्वक काम करणार असल्याचे म्हटले. मात्र महाराष्ट्राचा इतिहास आहे. राजकारणी सत्तेत असो वा विरोधात रंग लवकर बदलतात. आपण जनतेचे सेवक आहोत, मालक नव्हे. ही लोकप्रतिनिधींची भावना असायला हवी. पण अनेक लोकप्रतिनिधी नेमके त्याच्या उलट वर्तन करतात.
नांदेड येथे झालेल्या महाजनादेश सभेत देवेंद्र फडणवीस भाषण देण्यास आले असता त्यांना उपस्थित नागरिकांमधील एकाने कर्जमाफीचं काय झाल?, असा प्रश्न विचारला. फडणवीसांनी नुकतीच भाषणाला सुरवातच केली होती. त्यामुळे सभामंडपात शांतता होती. त्यामुळे त्या युवकाचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहचला. नाहीतर सामान्य नागरिकाला आपले म्हणणे मांडण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागतो. युवकाने विचारलेल्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर न देता. तू कॉंग्रेसचा आहेस की राष्ट्रवादीचा? असा प्रतीप्रश्न केला. त्यामुळे सभेत गोंधळ उडाला. त्या युवकाला सुरक्षारक्षकांनी सभेबाहेर नेले. फडणवीसांनी त्या युवकाला विरोधी पक्षाचा आहे म्हणून दुर्लक्षित केले. त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळूनही फडणवीस गडबडले. त्यांना काही सुचेना त्यामुळे त्यांनी भारत माता की जय , वंदेमातरम’च्या घोषणा सुरु केल्या. ते भाषण समाज माध्यमांवर उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात ते व्हायरल झाले.
दुसरं उदाहरण म्हणजे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ‘आदित्य सवांद’ या कार्यक्रमासाठी विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात गेले होते. यवतमाळ जिल्हा म्हणजे शेतकरी आत्महत्येची स्मशान भूमीच! साहजिकच एका शेतकरी पुत्राने आदित्य ठाकरे यांना प्रश्न केला. “यवतमाळ जिल्हा महाराष्ट्रात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कुणाची आई गेली कुणाचा बाप गेला. मात्र 100 वर्षात झाल्या नाहीत एवढ्या आत्महत्या या पाच वर्षात झाल्या. तुमच्याकडे आमदार आहेत. अनेक योजना राबवण्यासाठी तुम्ही सरकारवर दबाव आणू शकता. कारण तुम्ही पाठिंबा काढला तर सरकार पडतं? ” या युवकाच्या प्रश्नाचे उत्तर न देता तो युवक कोणत्या पक्षाचा आहे हे जाणून घेणे आदित्य ठाकरेंना जास्त महत्वाचे वाटले.या प्रकरणामुळे आज लोकशाही संदर्भात अनेक प्रश्न उभे राहातात. तो युवक कोणत्या पक्षाचा असो किंवा नसो लोकशाही असलेल्या देशात प्रश्न विचारणे चुकीचे आहे का?, तो युवक कोणत्या पक्षाचा जरी असता तरी त्याला उत्तर देणे देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्य नव्हते का? असे अनेक सवाल निर्माण झाले आहेत. प्रश्न विचारणे फक्त विरोधकांचे काम नाही तर जनतेचेही आहे. लोकप्रतिनिधी प्रचार सभेदरम्यान जनतेला आश्वासन देत असतात. त्यानंतर मतदारांच्या जोरावर ते सत्ता भोगतात. त्यामुळे सत्तेत आल्यावर दिलेल्या आश्वासनावर प्रश्न करणे जनतेचे काम आहे.
सध्याच्या राज्यकर्तांनी जनतेचे पक्षापक्षात विभाजन केल्याची जाणीव या घटनांतून होते आणि हे विभाजन नक्कीच धोकादायक आहे. यामुळे विकासही खुंटणार आहे. फक्त कोण्या एका गटाचाच विकास होणार आहे. निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी जेंव्हा शपथ घेतात. तेव्हा “मी मंत्री म्हणून माझी कर्तव्यनिष्ठा आणि शुद्ध विवेकबुद्धीने पार पाडीन आणि कोणत्याही प्रकारची भीती, पक्षपात, प्रेम किंवा द्वेष न बाळगता संविधान आणि कायद्यानुसार मी सर्व प्रकारच्या लोकांना न्याय देईन.’ असे म्हटले जाते. मात्र प्रत्यक्षात तसे घडतानाही दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे.
-संदीप कापडे