असा एकही दिवस जात नाही ज्यादिवशी वर्तमानपत्र पाहिले आणि त्यामध्ये बलात्काराची बातमी नाही. काही मिनिटाला एक बलात्कार होणाऱ्या आपल्या भारत देशाला “मेरा भारत महान’ तरी कसे म्हणावे? जितके बलात्कार दररोज या देशात घडतात त्यातील काहीच आपल्यासमोर येतात! आपल्या समोर न येणाऱ्या बलात्कारांची संख्या निश्चित जास्तच असेल! हैदराबाद येथील एका महिला पशू चिकित्सकावर बलात्कार करून त्यांना जिवंत जाळण्याचे अमानवी कृत्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या घटनेचा निषेध म्हणून विविध शहरात आंदोलने, श्रद्धांजलीपर सभा आणि निषेध सभा आयोजित केल्या जात आहेत.
निर्भया प्रकरणाने संपूर्ण देश हादरवून सोडला होता. अशा प्रकारच्या घटना आपल्या देशात वारंवार घडत आहेत. अशा किती निर्भयांचा अंत आपण पाहणार आहोत? समाज म्हणून आपण आज पूर्णतः अपयशी ठरलो आहे. मुलींचा स्वत:च्या जगण्याशी चालणारा संघर्ष एकीकडे तर समाजातील नतद्रष्ट माणसांचा त्यांना होणारा त्रास दुसरीकडे! सर्वच पातळ्यांवर आपल्या क्षमतांचा कस लागत असतानाही एकविसाव्या शतकातील आजची नारी खंबीरपणे लढतेय. मात्र, या तिच्या संघर्षपूर्ण लढ्याला प्रोत्साहन देण्याऐवजी माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य तिच्याशी माणूस म्हणून स्वतःला प्रगत समजणाऱ्या जातीकडून होत आहे.
हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार करणाऱ्या चारीही आरोपींना पोलिसांनी पकडले आहे. उद्या कायद्यानुसार त्यांना कठोरातील – कठोर शिक्षाही होईल मात्र त्या निष्पाप निर्भयाची यात चूक ती काय? जीवनाकडून प्रचंड अपेक्षा घेऊन ती जगण्याचा मानस करीत असेल, उराशी बाळगलेली असंख्य स्वप्ने तिची असतील! मात्र, माणुसकी संपविणारा आणि अनैतिक मूल्यांचा जयजयकार करणारा समाज आपल्यावर चालून येईल याची तिला कल्पनाच नसेल! मानवतेला काळिमा फासणाऱ्या बलात्काराच्या घटना घडल्यानंतर त्यावर रोष, राग, निषेध व्यक्त केला जात असतो. मात्र, हे करीत असताना काही गोष्टींचे भान आपण पाळले पाहिजे. भारतीय दंड संहिता कलम 228 – अ नुसार विवक्षित अपराधांना बळी पडलेल्या व्यक्तीची ओळख ज्ञात होईल असे नाव किंवा मजकूर प्रकशित करेल त्याला, दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा होईल, असे स्पष्ट सांगितले आहे. तरी सामान्य नागरिक, राजकारणी, ख्यातनाम व्यक्ती तसेच अधिकाऱ्यांकडून व्यक्त होताना कायद्याचा भंग केला जातो आहे. ही कृती लाखो लोकांनी केली असली तरी ती कायदेशीर अयोग्यच आहे.
हैदराबाद प्रकरणामध्ये पोलिसांनी सांगितल्यानंतर #justisfordisha या नावाने लोक व्यक्त होऊ लागली आहेत. मात्र तोपर्यंत त्या संबंधित पिडीतेची ओळख होईल असा गुन्हा सगळ्यांकडून झालेला होता.
-श्रीकांत येरूळे