विशाल भालेराव
खडकवासला – पुणे शहराच्या हद्दीलगतची 23 गावे पुणे महानगर पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे महानगरपालिकेसह आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे चित्रही बदलणार आहे. महापालिका निवडणूक प्रभाग रचनेवर अवलंबून असली तरी गावे शहरात आल्यानंतर उर्वरित भागांतील गण आणि गटाची रचनाही बदलणार असल्याने काही ठिकाणी जागा कमी तर काही ठिकाणी वाढणार आहेत.
त्यामुळे 23 गावे पालिकेत समावेशानंतर शहरासह जिल्ह्याचेही राजकारण ढवळून निघणार आहे. महानगरपालिका आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे प्रस्थापितांबरोबर इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असली तरी गावांया फेररचनेमुळे गण, गटात होणाऱ्या बदलांमुळे सावध भूमिका घेतली जात आहेत. शहरालगत राहणाऱ्या गावातील काहींनी तर महापालिका निवडणूक लढविण्याबाबतही चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.
23 गावे महानगरपालिकेत गेल्याने या गावात पहिला नगरसेवक म्हणू निवडणूक येण्याचा मान आपल्याला मिळावा, यासाठी बरेच जण इच्छुक आहेत. आपले गाव पालिकेत गेले नसले तरी शेजारचे गाव गेले याचा “आनंद’माणून पालिकेत गेलेल्या गावात आपलेच नातेवाईक असल्याने मतदानाची आखाडे बांधून पालिका निवडणुकीची तयारीही करणारे काही इच्छुक आहेत.
विशेष म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती बरोबराच आता 23 गावांसह लगतच्या गावातील इच्छुक मंडळींनी आतापासूनच निवडणुकीच्या तिकीटासाठी खासदार, आमदारांपर्यंत “सेटींग’ लावण्यास सुरूवात केली आहे. या निवडणुका जशा जवळ येतील, तसे राजकारणाचे चित्र अधिक स्पष्ट होत जाणार आहे.