खडकी येथे दिलीप वळसे पाटील यांचे प्रतिपादन
मंचर- आम्ही केलेली विकासकामे जर तुम्हाला दिसत नसतील तर यासारखे दुर्दैव असून विकास न दिसणे हे त्यांचे अज्ञान असल्याचे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ कोपरासभा घेण्यात आली, त्यावेळी मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषद सदस्या तुलसी भोर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शरद शिंदे यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच-उपसरपंच, विविध संस्थांचे अध्यच, उपाध्यक्षांसह सर्व संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वळसे-पाटील म्हणाले की, गेल्या 30 वर्षांत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची उभारणी, डिंभा डावा, उजवा कालवा, अभियांत्रिकी महाविद्यालय केल्याने या तालुक्याला एक वेगळे वैभव प्राप्त झाले आहे. सर्व सहकारी संस्थाच्या माध्यमातून सहा हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. तरी विरोधक म्हणतात वळसे-पाटील यांनी गेल्या 30 वर्षांत कोणती विकासकामे केली. माझे विरोधकांना जाहीर आवाहन आहे की, तुम्ही गेले 15 वर्षे खासदार असताना एक तरी ठळक केलेले काम दाखवा. तुम्ही गेली पंधरा वर्षे घोषणांचा पाऊस पडून जनतेला झुलवत ठेवले. त्यामुळे तुम्हाला जनतेने नाकारले असा टोला वळसे पाटील यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव न घेता लगवाला. समाजसेवक दादाभाऊ पोखरकर म्हणाले की,विरोधकांनी आमच्या गावात एकही मुरमाचे घमेले टाकले नाही. त्यामुळे त्यांना मते मागण्याचा कोणताही अधिकार नाही.