जालना – आपल्याला गोळ्या घातल्या, तरी आता मागे हटणार नाही. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या आंदोलनाचा काही मंत्र्यांना अपमान करायचा आहे, असा आरोप मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांनी मंगळवारी केला. या मंत्र्यांची नावे उद्या संध्याकाळपर्यंत जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कालच बोलणे झाले आहे. किती जणांना प्रमाणपत्र दिले आणि त्यांच्या परिवारातील किती लोकांना आपण प्रमाणपत्र दिले याबद्दल माहिती देण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे यांनी प्रशासनाकडे केली.
जरांगे पुढे म्हणाले की, ५४ लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, पण प्रशासनाने किती जणांना कुणबी दाखला दिला. त्यांच्या सोयऱ्यांना दाखला दिला?, असा सवाल करतानाच शासकीय अधिकाऱ्यांनी किती अडवणूक केली म्हणत त्यांनी हल्लाबोल केला आहे. तर आधीच हे सर्व दाखले दिले असते तर मराठा समाजावर मुंबईला जाण्याची वेळ आलीच नसती, आता आम्ही मुंबईला जाण्याची तयारी केली आहे, असा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्याची आमची मागणी आहे. आम्हाला माहिती आहे की, सरकार आमच्यावर डाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. माझ्यावर ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या रॅलीत कुठेतरी त्यांचे लोक घुसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आम्हाला त्यांचेच लोक, अधिकारी सांगत असल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला.
आपल्या लोकांनी विश्वासघात करू नये
कुणीही येऊ द्या मी त्यांना खेटायला तयार आहे. सरकार असो की विरोधी पक्ष असो कुणी मला खेटायला येत असेल तर मी खेटायला तयार आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला. सरकार गाव आणि तालुका लेव्हलवर चौकश्या करत आहे. कोण आमच्या बाजूने आहे हे आम्हाला समजत आहे. विरोध करणाऱ्यांना आम्ही मोजत नाही, आपल्या लोकांनी विश्वास घात करू नये, असे आवाहनही जरांगेंनी केले.