नवी दिल्ली – अडचणीत असलेल्या अल्युमिनियम उद्योगासमोरील कोळश्याच्या टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. कारण उन्हाळ्यामध्ये कोळसा कंपन्यांनी वीज उत्पादन करणाऱ्या प्रकल्पांना कोळसा पुरविण्यास प्राधान्यक्रम देण्याचे ठरविले आहे.
यामुळे अडचणीत आलेल्या ऍल्युमिनियम असोसिएशन ऑफ इंडियाने पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोळसा कंपन्यानी रेल्वे किंवा रस्त्याद्वारे फक्त औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा पुरविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या ऍल्युमिनियम उद्योगासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या सात महिन्यांपासून या उद्योगासमोर अडचणी आहेत. वीज निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना कोळसा पुरवठयाची परिस्थिती सुधारली असून आता वीज निर्माण करणाऱ्या केंद्राकडे नऊ ते दहा दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक आहे. मात्र ऍल्युमिनियमसह खत, पोलाद उत्पादन प्रकल्पांचा कोळसा पुरवठा थंडावला आहे.
त्यामुळे या प्रकल्पांचे उत्पादन कमी झाले आहे. हे प्रकल्प बंद पडले तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि रोजगार निर्मितीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची भीती निर्माण झाली असल्याचे या उद्योगाने म्हटले आहे. या उद्योगांना मोठ्या प्रमाणात वीज लागते. यासाठी या उद्योगांची स्वतःची वीज निर्मिती केंद्रे आहेत. मात्र या वीजनिर्मिती केंद्रांना कोळसा पुरविण्यात येत नाही. त्यामुळे या उद्योगावर परिणाम होत आहे. जागतिक बाजारात कोळशाचे दर जास्त असल्यामुळे आयात परवडत नाही.