भारताला दिलासा: रूग्ण दगावण्याचे प्रमाण 3 टक्के
नवी दिल्ली : करोनाबाधितांची संख्या 25 हजारांच्या घरात पोहचली असली तरी भारताला मोठा दिलासा देणाऱ्या घडामोडी घडत आहेत. देशात शनिवारी रूग्णांची संख्या केवळ 6 टक्क्यांनी वाढली. बाधितांच्या दिवसभरातील वाढीचा तो नीचांक ठरला. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली येथे करोनाविषयक उच्चस्तरीय मंत्रिगटाची बैठक झाली. त्यानंतर आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनातून देशाची चिंता कमी करणारी माहिती देण्यात आली. करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा देशातील वेग मंदावला आहे.
बाधितांची संख्या दुप्पट होण्याचे सरासरी प्रमाण आता 9.1 दिवस इतके झाले आहे. देशातील 5 हजारांहून अधिक रूग्ण आतापर्यंत करोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक आहे. तर, रूग्ण दगावण्याचे प्रमाण 3.1 टक्के इतके आहे. करोनाने तडाखा दिलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली आहे. देशव्यापी लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याचे म्हणता येऊ शकेल, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले.
दरम्यान, मंत्रिगटाच्या बैठकीत चाचण्यांबाबतची रणनीती आणि चाचण्यांच्या (टेस्टिंग) किटस्ची उपलब्धता यांचा आढावा घेण्यात आला. केवळ करोना संसर्गावर उपचार करणाऱ्या रूग्णालयांची राज्यनिहाय माहिती बैठकीत घेण्यात आली. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीची सामग्री (पीपीई किटस्), एन95 मास्क, औषधे, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन सिलिंडर यांच्या उपलब्धतेचा तपशील बैठकीत सादर करण्यात आला. देशात दररोज 1 लाखहून अधिक पीपीई किटस् आणि एन95 मास्कचे उत्पादन केले जात आहे. व्हेंटिलेटर्सचे उत्पादनही वाढवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.