मोदी आणि राहुल यांच्याविषयीच्या वक्तव्याबाबत दिले स्पष्टीकरण
नवी दिल्ली : ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सोमवारी वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायद्याला (का) कडाडून विरोध दर्शवला. तो कायदा अनैतिक आणि अतार्किक आहे. अयोग्य वेळी तो आणला गेला, अशी परखड भूमिका त्यांनी मांडली.
गुहा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. देशात सध्या आर्थिक पेच निर्माण झाला आहे. बेरोजगारी, शेतीची दूरवस्था, पर्यावरणविषयक प्रश्न अशी आव्हाने देशापुढे आहेत. त्यामुळे निदर्शनांचा विचार करून मोदी सरकारने कायदा मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आपल्या देशात धर्माच्या आधारे काही घडलेले नाही. मात्र, भेदभाव करणाऱ्या त्या कायद्यामुळे तसे घडत आहे. सर्वोच्च न्यायालयाने कायदा वैध ठरवला तरी निदर्शने थांबणार नाहीत, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीकाकार म्हणून गुहा यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याकडे मोदीस्तुती म्हणून पाहिले गेले. मेहनती मोदींपुढे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा टीकाव लागणार नाही. राहुल यांना संसदेत पाठवून केरळने घोडचूक केली, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
त्याबाबत गुहा यांनी मुलाखतीवेळी स्पष्टीकरण दिले. माझे राहुल यांच्याविषयीचे वक्तव्य म्हणजे मोदींना नेतृत्वाबाबत दिलेली मान्यता नाही. त्यामागे एक प्रकारचे नैराश्य आहे. पुढील निवडणुकीत मोदींशी लढणारा चेहरा हवा. तो चेहरा राहुल असू शकत नाहीत. मोदींचा पराभव करायचा असल्यास कॉंग्रेसला वेगळ्या स्वरूपाचे नेतृत्व द्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले.