आश्वासनाचा सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना विसर
मिरजगाव – नगर – सोलापूर महामार्गाची दुरवस्था झाली असून सातत्याने मागणी व आंदोलन करूनही या रस्त्याची दुरवस्था काही संपत नसल्याने मिरजगावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या रस्त्याने जा ये करणे म्हणजे जीव मुठीत घेवून जाण्यासारखे झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था काही संपली नाही. त्याचा त्रास स्थानिक मिरजगावकरांना होत आहे. या प्रश्नाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, यासाठी प्रहार संघटनेचे कर्जत तालुकाध्यक्ष राजेंद्र गोरे, मिरजगावचे सरपंच नितिन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे, भाजप शहराध्यक्ष कैलास बोराडे, निलेश बनकर, लहुजी वतारे यांच्यासह व्यापारी व ग्रामस्थांनी 10 जानेवारी रोजी नगर सोलापूर महामार्गावरील मिरजगाव येथे आंदोलन केले होते.
त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंते कडुस, म्हेत्रे यांनी हे काम आठ दिवसामध्ये सुरू होईल, असे आश्वासन दिले होते. पण आज या अधिकाऱ्यांना आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यामुळे मिरजगावकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठे दगड टाकण्यात आले असून ते दगड फोडण्याचे काम बाल कामगारांकडून केले जात आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला दगडांचा खच पडल्याने वाहनचालकाला तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून शालेय विद्यार्थ्यांना पायी जातांना आपला जीव मुठीतच घेऊन शाळेत जावा लागत असल्याने या नगर सोलापूर रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा पुन्हा एकदा रास्ता रोको आंदलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.