नवी दिल्ली – समाजातील ज्या घटकांकडे र्स्माट फोन नाही त्यांना तो घेता यावा यासाठी केंद्र सरकारने स्मार्ट फोनसाठी सबसीडी द्यावी जेणे करून डीजीटल क्रांतीचा लाभ त्या घटकांपर्यंतही पोहोचवणे सोपे होईल असे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. देशाने आता दूरसंचार क्षेत्रातील 5 जी प्रणालीचा वापरही सुरू केला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.
अंबानी यांनी या सबसीडीसाठी युएसओ म्हणजेच युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लीगेशन निधीचा वापर करावा असेही सुचवले आहे. दूरसंचार कंपन्यांकडून जी लायसन्स फी दिली जाते त्यातील पाच टक्के निधी युएसओ मध्ये जमा केला जातो.
सन 2002 पासून हा निधी जमवला गेला आहे. देशाच्या ग्रामीण व दुर्गम भागात फोन सेवा सुरू करण्यासाठी हा निधी वापरण्याची कल्पना आहे. तो निधी स्मार्टफोनच्या सबसीडीसाठी वापरता येईल असे अंबानी यांनी सुचवले आहे.
तथापि या निधीत जी रक्कम जमली होती, त्याच्या निम्मी रक्कम ग्रामीण भागात दूरसंचार सेवा पुरवण्यासाठी या आधीच खर्च झाली आहे असे कॅगने म्हटले आहे. इंडिया मोबाईल कॉंग्रेस मध्ये बोलताना अंबानी यांनी ही सुचना केली.
अंबानी म्हणाले की आता मोबाईल सेवेसाठी 5 जीच्या वापराला त्वरीत सुरूवात केली पाहिजे. प्राधान्य क्रमाने या सेवेचा वापर सुरू केला तर खऱ्या अर्थाने डीजीटल क्रांती लोकांपर्यंत परिणामकारकपणे पोहचवणे शक्य होईल असेही त्यांनी म्हटले आहे.