ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण
मंचर-कळंब-गणेशवाडी (ता.आंबेगाव) येथील वस्तीवरील कावळीमळ्यातील शेतकरी विठ्ठल भालेराव यांच्या उसाच्या शेतात शुक्रवारी (दि.29) सकाळी बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनविभागाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
याठिकाणी वनविभागाचे प्रवीण वेलकर, कोंडीभाऊ डोके यांनी भेट देवून पाहाणी केली. आढळलेले बिबट्याची बछडे उसाच्या शेतात पुन्हा सोडण्यास सांगितले. या बछड्यांना जर काही इजा झाली तर बिबट्याची मादी आणि नर सैरभैर होऊन नागरिकांना इजा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शेतकरी, ग्रामस्थांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वस्तीवर बहुतांशी शेतकऱ्यांच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला करुन ठार केले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी केली आहे.