मीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
पारगाव शिंगवे- मीना नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा मृतदेह 15 तासानंतर नदी पात्रातून बाहेर काढण्यात एनडीआरफच्या रेस्क्यू टिमच्या जवानांना यश आले आहे. या घटनेनंतर शिंगवे (ता. आंबेगाव) गावात शोककळा पसरली असून, गावात बंद पाळण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 29) मीना नदीच्या पात्रात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास प्रणेय राजेंद्र वाव्हळ (वय 16), वैभव चिंतामन वाव्हळ (वय 15) आणि श्रेयस सुधीर वाव्हळ (वय 15) हे पोहण्यासाठी गेले होते. तीनही मुले घरी न आल्याने त्यांचे कुटुंबीय सर्वत्र शोध घेत होते. सायंकाळी 6 च्या सुमारास गोविंद वाव्हळ हे नदीकाठी असलेल्या शेताकडे गेले असता त्यांना नदीच्या पात्राजवळ एक सायकल व नदीच्या पात्रात मुलांचे कपडे दिसले. त्यांनी मुलांच्या कुटुंबांना व ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. ही कपडे व सायकल आपल्या मुलांचे असल्याची कुटुंबांना खात्री पटली. ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात जाऊन मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे शोधमोहिमेत अडचणी येत होत्या.
सोमवारी (दि. 30) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मीनानदी काठी एनडीआरफचे पथक दाखल झाले. एनडीआरफच्या सर्च टीमचे प्रमुख महेश कुमार यांनी नदीच्या पात्राच्या परिसराची पाहणी केली. नदीचे पात्र 15 ते 20 फूट खोल आहे. त्यानंतर एनडीआरफचे जवान बोट घेऊन नदीच्या पात्रात उतरले. जवानांना पहिला मृतदेह साडेसात वाजता प्रणेय वाव्हळ याचा हाती लागला. त्यानंतर आठ वाजता वैभव वाव्हळ आणि साडेनऊ वाजता श्रेयस वाव्हळ याचा मृतदेह एनडीआरफच्या जवानांनी नदीच्या पात्रातून बाहेर काढला. यावेळी नदीकाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. महसूल विभागाचे अधिकारी व मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यावेळी उपस्थित होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी संबंधित कुटुंबांचे सांत्वन केले आहे.
नदीतून बाहेर काढलेले तीनही मृतदेह मंचर येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छादनासाठी पाठविण्यात आले आहेत. शोकाकुल वातावरणात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या तीनही मुलांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले.