आर्थिक अधोगतीवर राहुल गांधी यांची टीका
नवी दिल्ली – देशाच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. जागतिक क्रमवारीत भारताच्या अर्थव्यवस्थेचे स्थान पाचव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरल्याचे नुकतेच जाहीर झाले आहे त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात दिलेल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की अनेक दशकांच्या प्रयत्नांनंतर देशाने जे उभे केले तर भाजप सरकारने उद्धवस्त केले आहे.
भाजपचे लोक नवीन काहीही उभे करीत नाहीत. त्यांच्यात ती क्षमता नाहीं. ते केवळ उभे राहिलेले उद्धवस्त करीत आहेत. अनेक दशकांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि कष्टानंतर देशात मोठे काम उभे राहिले आहे ही उभारणी भाजपने उद्धवस्त केली आहे असे त्यांनी म्हटले आहे. या ट्विटर संदेशात राहुल गांधी यांनी देशातील काही उद्योगपतींनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सध्याच्या अधोगती बद्दल जी विधाने केली आहेत त्याची कात्रणेही त्यांनी जोडली आहेत.
बीएसएनएल. एमटीएनएल या कंपन्यांना जुलै महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांचा पगारही देता आलेला नाही. रेल्वेत आता कर्मचारी कपात केली जाणार आहे. वाहन उद्योग क्षेत्रातील विक्री गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आली आहे. याकडेही राहुल गांधी यांनी या ट्विटर संदेशात लक्ष वेधले आहे.