डाळिंब, सोयाबीन, ऊस, पपई, केळी, कांदा पिकांवरही परिणाम
अणे – गुंजाळवाडी (ता. जुन्नर) येथील हसन अहमद पठाण या शेतकऱ्याने 1 महिन्यापूर्वी शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे पीक सतत चालू असलेल्या पावसामुळे एकत्र जमा करून ठेवता आले नाही. त्यामुळे या सोयबीन पिकाला शेतातच पुन्हा कोंब फुटू लागले आहेत.
गेल्या महिन्यापासून पावसामुळे अद्याप शेतात पाऊल ठेवता येत नसल्याने पीक तसेच ठेवावे लागले. पाऊस झाल्यामुळे शेतात असणाऱ्या सोयाबीनचे संपूर्ण पीक भिजून वाया गेले आहे. अद्यापही शेतात काढून ठेवलेले पीक तसेच आहे. याच शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब येऊन पुन्हा सोयाबीनचे पीक बहरलेले आहे. पठाण यांचं संपूर्ण शेत हिरवे दिसत आहे. ते काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब येऊन वाढलेले सोयाबीन आहे.
यामुळे पठाण हताश झाले असून त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन कराव लागत आहे. या भागातील डाळिंब, सोयाबीन, ऊस, पपई, केळी, कांदा या पिकांवर पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. परतीच्या पावसाने उघड दिलेला आठवडा झाला आहे तरी शेतात
जाता येत नाही.
गेल्या 50 वर्षात असा कधी पाऊस झाला नव्हता. या पावसानं शेतात काढून ठेवलेल्या माझ्या साडेतीन एकर सोयाबीनच्या पिकाला सतत पडणाऱ्या पावसामुळे कोंब येऊन बहर आला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. माझ्या दोन्ही शेतातील पाणी अद्याप कमी झाले नाही. त्यामुळे शेतात जाता येत नाही. माझं तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. सरकारने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती आहे.
-हसन पठाण, शेतकरी गुंजाळवाडी