बारामती/ जळोची – निवडणूक पूर्व होणारे सर्व्हे यामध्ये कितपत तथ्य आहे. यांची विश्वासार्हता किती आहे, असा प्रतिप्रश्न करून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सध्या जे राजकारण सुरू आहे. त्यामध्ये या सर्व्हेला काहीही महत्त्व नाही, असे उत्तर दिले.
बारामती येथे रविवारी (दि. 30) कृषी विभागामार्फत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. ते म्हणाले, हे असे सर्व पाहिले की मला माझा जुना पक्ष प्रकर्षाने आठवतो. या सर्वांची विश्वासार्हता किती आहे, हा खरे तर प्रश्न आहे. हे सर्व कसे चालतात, हे मला चांगले माहिती आहे.
सर्व्हे करणारे चैनल व कंपन्या किती लोकांची मते जाणून घेतात. ती संख्या किती असते हा एक मोठा प्रश्न आहे. सहभाग नोंदवणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार सर्व्हेचे निकाल बदलत असतात. त्यामुळे या सर्वांना जास्त महत्त्व देता येत नाही.
सध्याचे राजकारण सुरू आहे त्या राजकारणामध्ये या सर्वे ला काहीही महत्त्व नाही असे देखील मुंडे यावेळी म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये एकीकडे पूर परिस्थिती तर दुसरीकडे आवर्षण व दुष्काळीस्थिती आहे.
याबाबत माध्यम आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना छेडले असता ते म्हणाले, ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा बाधितांना मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून मदत केली जाईल. याबाबतचा निर्णय झाला आहे.