हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता प्रदीप गारटकरांनी उपस्थित केला सवाल
रेडा- भ्रष्टाचाराने बरबरटल्यानंतर स्वत:ची पापे झाकण्यासाठी भाजपात गेलेल्यांना जनतेचे देणे घेणे नाही. ज्या माणसाला कॉंग्रेस पक्षाने 40 वर्षांत सर्व दिले त्यांनी त्यांना एका झटक्यात सोडून दिले ते तुमचे आमचे कसे होणार? असा सवाल पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केला.
नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरात महाआघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला. त्यावेळी प्रदीप गारटकर बोलत होते. याप्रसंगी सारिका भरणे, तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील, राजेंद्र तांबीले, प्रताप पाटील, अरबाज शेख, श्रीकांत बोडके, अमोल भिसे, अभिजीत तांबीले, नागेश गायकवाड, तुकाराम घोगरे, बाळासाहेब कोकाटे, दत्तात्रय घोगरे, बाळासो करगळ आदि मान्यवर उपस्थित होते. प्रचाराचा शुभारंभ झाल्यावर टणू, गिरवी येथे प्रचार सभा झाली.
प्रदीप गारटकर म्हणाले की, वीस वर्षे मंत्री पदावर असताना स्वत:च्या गटातील रस्ते यांना करता आले नाहीत. तर अर्बन बॅंकेचा एनपीए 45 टक्के असून कारखान्यावर 450 कोटीचे कर्ज झाले आहे. ईडीच्या कचाट्यातून वाचण्यासाठीच घाई गडबडीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या अनेक प्रकरणातून शरद पवार यांनी त्यांना वाचवले आहे. तरीसुद्धा त्यांच्यावर टीका करून बाहेर पडलात, असे त्यांनी नमूद केले.
पक्षाने तालुक्यात केलेल्या सहा सर्व्हेत भरणे यांना 58 टक्के, तर पाटील यांना 48 टक्के पसंती दिली. त्यामुळे पक्षाने जात नाही तर कर्तृत्वाच्या जोरावर भरणे यांना तिकीट दिले. त्यामुळे इतरांनी थांबून कामास लागणे गरजेचे आहे. तुम्हाला मार्केट कमिटी, खरेदी-विक्री संघ व जिल्हा बॅंकेचे संचालक देवूनही जनतेचा विश्वास घात केला. त्यामुळे विरोधक धार्मिक भावना भडकवून मतदान मागतील. शरद पवार धर्मवादापेक्षा प्रयत्न वादाला महत्त्व देणारे नेते असल्याने यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे. तरी शेती, शेतकरी व सहकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महारूद्र पाटील, सारीका भरणे, राजेंद्र तांबीले, दत्तात्रेय घोगरे, उमेश घोगरे, अजित टिळेकर यांची भाषणे झाली. प्रास्ताविक श्रीकांत दंडवते यांनी केले. तर सूत्रसंचालन गौरव दंडवते यांनी तर जगदीश सुतार यांनी आभार मानले.
- म्हणून 260 कोटींचा निधी आला
श्री लक्ष्मी नरसिंह देवस्थानच्या तीर्थक्षेत्राच्या “क’ वरून “ब’ दर्जा देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत केली. त्यामुळे आताचा 260 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देता आला, अशी माहिती प्रदीप गारटकर यांनी दिली.