इंफाळ – मणिपूरच्या सूरज चंद जिल्ह्यातील म्यानमार सीमेजवळ शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आसाम रायफल्सच्या ताफ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. सिंगत उपविभागातील एस सेहकेन गावाजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर आणि त्यांचे कुटुंबीय शहीद झाले आहे. कर्नल बिप्लब त्रिपाठी (CO-46 AR), त्यांची पत्नी आणि मुलगा यांचा हल्ल्यात जागीच मृत्यू झाला असून इतर जखमींना बेहियांग प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, या हल्ल्यात क्यूआरटीचे तीन सदस्यांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हल्ला केला. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्यूआरटी टीमवर हल्ला झाला त्यावेळी अधिकाऱ्याचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. दरम्यान अजूनही कारवाई सुरू असून आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यामागे मणिपूरच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा हात असल्याचे बोलले जात आहे. मणिपूरची पीपल्स लिबरेशन आर्मी 1978 मध्ये स्थापन झाली. भारत सरकारने ही संघटना दहशतवादी म्हणून घोषित केली आहे. मणिपूरमध्ये या संघटनेने यापूर्वीही भारतीय सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत. ही दहशतवादी संघटना स्वतंत्र मणिपूरची मागणी करत आहे. विश्वेसार सिंग यांनी या संघटनेची स्थापन केली होती.