नवी दिल्ली – पाकिस्तानच्या हवाई दलाच्या (Pak air force) मियानवाली येथील प्रशिक्षण केंद्रावर आज पहाटेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान तळावरील तीन विमानांचे नुकसान झाले. मात्र सर्वच्या सर्व 9 दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले, असे पाक लष्कराने म्हटले आहे. हवाई दलाच्या या तळावरील चकमक संपल्यानंतर येथील कोंबिंग ऑपरेशन संपले असल्याचे हवाई दल तळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दहशतवाद्यांनी तळाच्या परिसरात पेरून ठेवलेली स्फोटके निकामी करण्यासाठी हे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले होते, असे लष्कराच्या निवेदनामध्ये म्हटले आहे.(Pak News)
या दहशतवादी हल्ल्यामध्य हवाई दलाच्या तळावरील कोणीही जखमी झाले नाही. तसेच सध्या कार्यरत असलेल्या विमानांचेही नुकसान झाले नाही. सध्या वापरात नसलेल्या 3 विमानांचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. “तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’शी संबंधित असलेल्या “द तहरिक-ए-जिहाद पाकिस्तान’ या नव्याने अस्तित्वात आलेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानचे हंगामी पंतप्रधान अन्वरउल हक काकर यांनी या दहशतवादी हल्ल्यावर टीका केली आहे. पाकिस्तानच्या सुरक्षेला धोका पोहोचवणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला असेच प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यांचा आणि हवाई तळावरील हल्ल्यांमागे एकच संघटना असल्याच्या शक्यतेने तपासाला सुरुवात केली गेल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री सर्फराज बुग्ती यांनी सांगितले.
सलग दुसऱ्या दिवशी मोठा दहशतवादी हल्ला
पाकिस्तानमदील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांताच्या रहिवासी भागांमध्ये कालच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 17 सैनिक ठार झाले होते. अशांत दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर जिल्ह्यातील ओरमारा भागात सुरक्षा दलांना घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांवर अतिरेक्यांनी शुक्रवारी हल्ला केला होता. त्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. ग्वादर हल्ल्याच्या काही तास आधी, खैबर पख्तुनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात पोलीस आणि सुरक्षा दलांच्या ताफ्यांना बॉम्बस्फोटांनी लक्ष्य करणारे साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एक सैनिक आणि पाच जण ठार झाले आणि 24 जण जखमी झाले होते. बलुचिस्तानमध्ये फुटिरवादी आणि दहशतवाद्यांनी अलिकडच्या काळात केलेल्या हल्ल्यांमध्ये इतक्या जास्त संख्येने सैनिक ठार झाले आहेत.