हैदराबाद – केसीआर या नावाने ओळखले जाणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय पातळीवर नवी आघाडी स्थापण्याची गरज सातत्याने बोलून दाखवत आहेत. अशात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यांनी मंगळवारी येथे केसीआर यांची भेट घेतली. त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
भारताचा सर्वांगीण विकास करण्यात कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना अपयश आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर त्या दोन्ही पक्षांना वगळून नवी आघाडी अस्तित्वात यायला हवी, अशी भूमिका केसीआर मांडत आहेत.
काही दिवसांपूर्वीच डाव्या पक्षांच्या नेत्यांनी केसीआर यांची भेट घेतली होती. त्यापाठोपाठ तेजस्वी यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांच्यात राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्या चर्चेचा तपशील उघड करण्यात आला नाही.
मागील काही दिवसांपासून राजद आणि कॉंग्रेसमधील संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. अशात केसीआर-तेजस्वी भेट झाल्याने वेगवेगळे राजकीय अंदाज बांधण्यासाठी खतपाणी मिळू शकते.