पुणे – राज्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबध्द आहे. नजिकच्या काळात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीही करण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये “पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. पवित्र पोर्टल या संकेतस्थळाद्वारे शिक्षक भरतीचा शुभारंभ केसरकर यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यात दि. 22 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती.
या चाचणीस 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 16 हजार 443 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीसाठी उपस्थित होते. या परीक्षेतील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील रिक्त पदांची शिक्षक भरती करण्यात येणार आहे. चाचणीस प्रविष्ट उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्व: प्रमाणपत्रात आवश्यक माहिती नमूद करण्याची सुविधा दि. 15 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
तर, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती मुलाखतीशिवायच्या भरतीसाठी असतील. खासगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहीराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील असणार आहेत.
गैरप्रकार करणारे उमेदवार “ब्लॅक लिस्ट’मध्ये
सन 2018 व 2029 मधील टीईटी परीक्षेच्या गैरप्रकारातील उमेदवारांना शिक्षक भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कोणत्याही टप्प्यावर उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे. काही उमेदवार एकापेक्षा जास्त वेळा चाचणीस प्रविष्ट झाल्याने निदर्शनास आले असून या उमेदवारांनाही भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.