हिरडस मावळ – भोर तालुक्यातील पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या रांगा होय. हाच भाग खऱ्या अर्थाने डोंगराळ असल्याने अनेक प्रकारच्या झाडाझुडपांनी व्यापलेला आहे. याच झुडुपांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रानमेव्याचे अस्तित्व टिकून आहे. या रान मेव्यात प्रामुख्याने डोंगरची मैना म्हणून ओळखली जाणारी करवंदे, तसेच आळु, आमगुळे, तोरणे या झुडुप जातीच्या झुडपांना आता फुले येऊ लागली असून, ही झुडपे बहरली आहेत.
तोंडाला पाणी सुटेल असा चविष्ट, आंबट गोड, रसाळ रानमेवा जिभेवर ठेवताच ग्रीष्मातील दाहकता पाहताच क्षणी कमी करतो. तासन् तास या रानमेव्याच्या विशिष्ट चव रेंगाळत राहते. या परिसात अशा करवंदांच्या जाळ्या सध्या पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरल्या असल्याने परिसर मोहक दिसत असून,
आता काही दिवसांतच करवंदाची चव चाखायला मिळणार आहे. चैत्र महिना सुरू होताच या आंबट-गोड चवीच्या करवंदांचे डोंगराच्या कुशीत काटेरी जाळ्यांत पांढऱ्या रंगाची फुले दिसू लागतात. या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाचे करवंद बहरतात. डोंगर रांगांत मोठ्या प्रमाणात करवंदांच्या जाळ्य्ा पाहायला मिळतात.
प्रक्रिया होणे गरजेचे
हे फळ बेरी वर्गीय असून, त्याचा आरोग्याच्या दृष्टीनेही उपयोग होतो. यामधील अनेक घटक रोगप्रतिबंधांचे काम करतात. करवंद हे नाशवंत फळ आहे. मात्र, कच्च्या करवंदांचे लोणचे व पिकलेल्या करवंदांचा मुरंबा केला, तर प्रक्रिा केलेले हे फळ जास्त दिवस टिकते, त्यामुळे या फळांवरील प्रक्रियायुक्त उत्पादनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
या झुडपांच्या संवर्धनाची गरज
करवंदांच्या झाडांना प्रचंड प्रमाणात काटे असतात अशामध्ये कष्टपूर्वक पहाटे लवकर उठून करवंदे तोडण्यासाठी रानात पायपीट करत आजूबाजूच्या खेड्यापाड्यात तसेच तालुक्याच्या ठिकाणी विक्रीसाठी नेली जातात. परंतु गेली दोन वर्षापासुन करोनामुळे करवंदे व्यवसाय ठप्प झाला होता; डोंगरांना लागणारे वणवे, वृक्षतोड यांमुळे रानमेव्याच्या झाडांची संख्या कमी होत असल्याने याही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.